नवीन पुलांवर खड्डेच खड्डे
By Admin | Updated: July 13, 2014 23:07 IST2014-07-13T23:07:55+5:302014-07-13T23:07:55+5:30
सायन-पनवेल मार्गावर नव्याने उभारलेल्या पुलांवर देखील वाहन चालकांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे

नवीन पुलांवर खड्डेच खड्डे
नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर नव्याने उभारलेल्या पुलांवर देखील वाहन चालकांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दोन महिन्यांपूर्वीच बांधकाम पूर्ण झालेल्या या पुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या पुलांच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सायन पनवेल मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नुकतेच नवे चार पूल उभारण्यात आले आहेत. सदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हे पूल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या या मार्गावर वाशी ते कळंबोली दरम्यान नवे व जुने असे एकूण १० पूल आहेत. मात्र या पुलांवरुन प्रवासादरम्यान प्रवाशांना सुखद प्रवासाचा अनुभव मिळणे अपेक्षित असतानाच त्यांचा हिरमोड होत आहे. या नव्या पुलांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शहरात गेले दोन दिवस मुसळधार पाउस कोसळत आहे. या पावसाने नव्या पुलांच्या बांधकामाचा निकृष्ट दर्जा उघडकीस आणला आहे. कळंबोली, सानपाडा, शिरवणे, कोपरा, उरण फाटा येथील नव्या पुलांवर देखिल हे खड्डे दिसून येत आहेत. पावसाळ्यापूर्वीच या पुलांचे बांधकाम पूर्ण करुन ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे अवघ्या एक महिन्याच्या कालावधीतच पुलांची ही दुरवस्था झाली आहे. शिरवणे येथील पुलावर देखील मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाळूच्या सहाय्याने बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु ही वाळू रस्त्यावर पसरल्याने दुचाकींच्या अपघाताची शक्यता तेथे आहे. तर पुलावरुन जाणा-या वाहन चालकांना खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गाचे रुंदीकरण व पूल बांधकामाचा खर्च वसुलीसाठी खारघर ते तळोजा दरम्यान टोल नाका उभारण्यात आला आहे. मात्र या टोलनाक्यालगतच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे लवकरच सुरु होणारा टोल भरण्यापूर्वीच वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचे धक्के सहन करावे लागणार आहेत. तर या मार्गावर अद्यापही अनेक समस्या असतानाही नक्की टोल आकारणी कशासाठी होणार असा प्रश्नही वाहन चालकांना पडला आहे. उरणफाटा येथील नव्या पुलाखालील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहतुक कोंडीची समस्या उद्भवत आहे. मार्गाच्या रुंदीकरणानंतर रस्त्याच्या दुतर्फा पदपथाचे काम सध्या सुरु आहे. त्याकरीता साठवलेली रेती देखिल रस्त्यावर इतरत्र पसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मार्गावर अद्यापही वाहन चालकांना त्रासाला समोरे जावे लागत आहे. परंतु त्याकडे संबंधीत ठेकेदाराकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे.