‘कासा’तर्फे रग्गेड सह्याद्रीचा २० सप्टेंबरपासून थरार
By Admin | Updated: September 5, 2014 23:58 IST2014-09-05T23:52:57+5:302014-09-05T23:58:40+5:30
दहा गटांत होणार स्पर्धा : हिमाचल प्रदेश, मुंबईतील स्पर्धक सहभागी होणार

‘कासा’तर्फे रग्गेड सह्याद्रीचा २० सप्टेंबरपासून थरार
कोल्हापूर : सायकलिंग, ट्रेकिंग आणि नकाशाच्या साहाय्याने दिशादर्शन अशा साहसी क्रीडा प्रकारांचा समावेश असणारी ‘रग्गेड सह्याद्री’ स्पर्धा कोल्हापूर अॅडव्हेंचर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे (कासा) दि. २० व २१ सप्टेंबरला होणार आहे. स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष आहे. दहा गटांमध्ये होणाऱ्या स्पर्धेत यावर्षी हिमाचल प्रदेश, मुंबई, पुणे, कोल्हापुरातील सुमारे तीनशे स्पर्धक सहभागी होतील, अशी माहिती ‘कासा’चे अध्यक्ष आकाश कोरगांवकर व पुष्पाजंली सोळंकी यांनी आज, शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोरगांवकर म्हणाले, कोल्हापूरची वेगळी ओळख बनलेली ‘रग्गेड सह्याद्री’मध्ये गेल्यावर्षी २६० स्पर्धक सहभागी झाले होते. यातील २५० जणांनी स्पर्धा पूर्ण केली होती. त्यात मुलींचा सहभाग लक्षणीय होता. यावर्षी स्पर्धेत हिमाचल प्रदेश, मुंबई, पुणे, बंगलोर, चेन्नई, कोल्हापूर, आदी शहरांतील सुमारे तीनशे स्पर्धक सहभागी होतील, असा अंदाज आहे. दि. २० सप्टेंबरला कोल्हापूर शहरातून स्पर्धेला सुरुवात होईल. सातेरी आणि गगनबावडा परिसरात स्पर्धा होईल.
सोळंकी म्हणाल्या, या स्पर्धेचे स्वरूप सांघिक असून, ती दहा गटांत होईल. यातील कुटुंब, शालेय, ४० वर्षांवरील, नवोदितांसाठी ३५ किलोमीटर, डॉक्टर, अॅमॅच्युअर आणि कॉर्पोरेटसाठी ९०, तर डिफेन्स, खुला, महाविद्यालयीन गटांसाठी १३० किलोमीटर अंतर असणार आहे. यातील विजेत्या संघांना एकूण २ लाख ५० हजार रुपयांची बक्षिसे, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस संतोष पाटील, रोहन अथणे, संतोष गुरव, रोहित कारेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)