कणकवली/सावंतवाडी : आरोंदा जेटीबाबत आज सुनावणी
By Admin | Updated: January 9, 2015 00:47 IST2015-01-09T00:35:20+5:302015-01-09T00:47:53+5:30
राजकीय वातावरण तापले : राणे, उपरकर, वैभव नाईक, राजन तेली मैदानात

कणकवली/सावंतवाडी : आरोंदा जेटीबाबत आज सुनावणी
कणकवली/सावंतवाडी : आरोंदा जेटीप्रश्नी उच्च न्यायालयात अवमान याचिका आरोंदा जेटी विरोधी संघर्ष समितीच्या वतीने दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी शुक्रवार दि. ९ रोजी होणार आहे.
यासंदर्भात सध्या सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. या सुनावणीनंतरच या जेटीचे भवितव्य निश्चित होणार आहे. दरम्यान, या जेटीच्याबाजूने माजी आमदार राजन तेली असून त्यांनी काँग्रेस राजकारणाच्या नावाखाली व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे मात्र जेटीच्या विरोधात आक्रमक झाले असून आमदार नीतेश राणे जिल्हाभर रान उठवित आहेत.
दरम्यान, जेटी होऊ नये म्हणून मनसेचे परशुराम उपरकर यांनीही आक्रमक धोरण घेतले असून त्यासंदर्भात अवमान याचिका दाखल करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)
काय आहे आरोंदा बंदराची पार्श्वभूमी
आरोंदा जेटीला तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या ६० व्या बैठकीत म्हणजेच ३ एप्रिल २०१२ मध्ये परवानगी दिली.
या परवानगीनंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेवर सुनावणी होऊन मूळ एक जेटी ग्राह्य मानण्यात आली असून सध्या सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे.
आरोंदा येथे जेटीविरोधी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने अनेक आंदोलने केली. मात्र, त्यांना हवे तसे यश आले नाही.
दरम्यान, व्हाईट आॅर्चिड या कंपनीने बंदराकडे जाणारा रस्ता अडवित तेथे भिंत उभी केल्यानंतर आंदोलनाने खरे उग्र रूप धारण केले. अशावेळी माजी आमदार राजन तेली हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस व नंतर भाजपमध्ये प्रवेश केला व सावंतवाडीतून विधानसभा निवडणूक लढवली.
निवडणूक संपल्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांचा छुप्या पध्दतीने सुरू असलेला विरोध उग्र स्वरूपात सुरू झाला त्यातून सोमवारी ४ जानेवारीला स्थायी समितीचे पदाधिकारी हे जेटीची पाहणी करण्यासाठी आरोंदा येथे गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत आरोंदा ग्रामस्थही होते. तेथे दगडफेक त्यानंतर लाठीमार असा प्रकार घडला आणि बंदर चर्चेत आले.
लोकांच्या बाजूने राहणार
आरोंदा जेटीप्रश्नी काँग्रेस लोकांच्यासमवेत राहणार आहे. जेटीच्या माध्यमातून लोकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही जेटी होऊ देणार नाही. असे आरोंदा येथील बैठकीच्यावेळी राणेसाहेबांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या विषयात काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- नीतेश राणे, आमदार काँग्रेस
तेलींचे आयुष्य दलालीत : परुळेकर
सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी आमच्यावर केलेले आरोप पुराव्यासहित सिद्ध करावेत. आम्ही राजकरणातून संन्यास घेऊ, असे खुले आव्हान काँग्रेसने दिले. तेलींचे पूर्ण आयुष्य दलालीत गेले असून त्यांनी दुसऱ्यांना तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगू नये, असा सल्लाही काँॅग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.
तर ही वेळ आली नसती
लोकप्रतिनिधी नसताना जनतेच्या समस्या आता नारायण राणेंना समजत आहेत. याबद्दल मनसेच्यावतीने त्यांचे अभिनंदन करतो. मात्र आमदार तसेच मंत्री असताना त्यांना जनतेच्या समस्या समजल्या असत्या तर माजी लोकप्रतिनिधी होण्याची वेळ त्यांच्यावर आता आली नसती, अशी बोचरी टीका परशुराम उपरकर यांनी केली.
काळसेकर गप्प का?
आरोंदा जेटीप्रश्नी भाजपाने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर याप्रश्नी अजून गप्प का? असा प्रश्न मनसेचे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.
आरोंदा जेटीला सेनेचा विरोधच : वैभव नाईक
सावंतवाडी : आरोंदा जेटीशी शिवसेनेचा काडीमात्र संबंध नाही. सर्वच राजकीय पक्षाशी शिवसेना सहमत असून जेटीला आमचाही विरोध आहे. आणि हा विरोध यापूर्वीही व्यक्त केला आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
गावात आमच्याबद्दल काही गैरसमज असू शकतो पण हा गैरसमज आम्ही दूर करू, या जेटीला ज्या परवानग्या देण्यात आल्या, त्या तत्कालीन मंत्र्यांनी दिल्या आहेत. तेच आज या जेटीला विरोध करीत आहेत. उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचले आहे. पण जेटी कंपनीने काही केलेले बांधकाम हे बेकायदेशीर असून यावर आमचा आक्षेप आहे. त्यावर शासनस्तरावर निर्णय होईलच. आम्ही सध्या सत्ताधारी असून आमच्यावर टीकाही होणारच पण आम्ही कधीही ग्रामस्थांची साथ सोडणार नाही.
पूर्वीही विरोधात होतो आणि भविष्यातही विरोधात राहणार असून पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊतही जनतेच्या बाजूने आहेत. ते ही जनतेलाच मदत करतील, अशी आशा व्यक्त करत शिवसेनेची भूमिका केव्हाही बदलणार नाही, असा विश्वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला.
आरोंदावासियांवर झालेला लाठीमार ही दुर्दैवी घटना असून आम्ही या विरोधात पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. तसेच कुणालाही चौकशीशिवाय अटक करू नये, ही शिवसेनेची भूमिका आहे.
पालकमंत्र्यांनी लाठीमार करण्यास सांगितले, असे सांगणे मुळात चुकीचे असल्याचेही आमदार नाईक म्हणाले. (प्रतिनिधी)
राणे खोटे बोलताहेत : परशुराम उपरकर
कणकवली : राजन तेली यांनी आपल्याला जेटीबाबत चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे आरोंदा जेटीचे आपण समर्थन केले, असे सांगणारे नारायण राणे खोटे बोलत असल्याची टीका मनसेचे कोकण विभागीय संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
येथील संपर्क कार्यालयात गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, गेली तीन वर्षे आरोंदा येथील मच्छिमार, ग्रामस्थ तसेच संघर्ष समितीने जेटीप्रश्नी लढा सुरू ठेवला. ग्रामस्थांना न्याय मिळावा यासाठी विधान परिषदेमध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केला. मात्र तत्कालीन पालकमंत्री तसेच बंदर विकास मंत्री नारायण राणे यांनी या जेटीचे समर्थन केले होते. राजन तेली यांनी जेटीबाबत चुकीची माहिती दिली, असे आता राणे सांगत असले तरी ते साफ खोटे आहे. मच्छिमारांनी तीन ते चारवेळा राणे यांना निवेदन देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले. त्यावेळी राणे यांनी या जेटीची वर्गवारी केली असती तर दोन राज्यांच्या सीमेवर ही जेटी असल्याने ती ‘अ’ वर्गात आली असती. त्यामुळे याप्रश्नी जनसुनावणी घ्यावी लागली असती, पण तेली यांचे चोचले पुरविण्यासाठी तसा प्रयत्न राणे यांनी केला नाही. त्यामुळेच त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्याचा तसेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री देत असतो, हे राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना सांगितले आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलने केली, त्यावेळी तत्कालिन पालकमंत्री नारायण राणे यांच्या आदेशानेच आमच्यावरही लाठीचार्ज केला असेल, हे यावरून सिद्ध झाले.
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जेटीच्या विरोधात असल्याचे जाहीर केले आहे. मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. यावरून आरोंदा जेटीप्रकरणी शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचे स्पष्ट होते. केसरकर जेटीविरोधात कधीही भूमिका घेणार नाहीत हे त्यांच्या कार्यपद्धतीवरून स्पष्ट झाले आहे. खासदार विनायक राऊत जिल्ह्यात असताना त्यांनीही या प्रकरणाची दखल घेतलेली नाही. वैभव नाईक यांनी तेली यांचा जेटी हा वैयक्तिक प्रश्न असल्याचे स्पष्ट केले आहे. युतीच्या नेत्यांना त्यांनी याबाबत विचारले का? हे नाईक यांनी जाहीर करावे. ग्रामस्थांना बरोबर घेऊन लढा दिल्याचे उपरकर यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
मग रेडीवासियांचे रक्त का दिसले नाही : राजन तेली
सावंतवाडी : व्हाईट आॅर्चिड कंपनीने जेटीचे काम करण्यास सुरूवात केल्यानंतर आरोंदा ग्रामस्थांनी जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पण कालचा जो प्रकार घडला त्याला सर्वस्वी काँॅग्रेस जबाबदार आहे. आरोंदावासियांचे रक्त त्यांना दिसते. मग रेडीवासीयांचे का दिसत नाही, असा सवाल माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे.
काँॅग्रेस राजकारणाच्या नावाखाली माझ्या व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत असून, त्यांनी मला संपविण्याचा विडा उचलला आहे. असा आरोप करीत आरोंदा येथील प्रकार खेदजनक आहे. मात्र काँग्रेस आरोंदावासियांच्या रक्ताचे बोलतात. मग रेडीतील सांडलेले रक्त कोणाला तेव्हा का दिसले नाही. सर्वजण रेडी बंदर वाचवण्यासाठी आरोंदा बंदराला विरोध करीत असून या विरोधाला जनता भीक घालणार नाही, असा आशावादही तेली यांनी व्यक्त केला.
रेडी येथे आंदोलन झाले तेव्हा १४५ जणांवर लाठीमार झाला. तेव्हा अनेक महिलांना पोलिसांनी फरफटत पोलीस ठाण्यात नेले. तेव्हा दिलेला आदेश कुणाचा होता, असा सवाल करीत काँॅग्रेस लोकांना भडकवत आहे. कंपनी आरोंदा येथील ग्रामस्थांशी केव्हाही बोलण्यास तयार आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यास तयार आहे. पण यात राजकीय हस्तक्षेप नको ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाईही देऊ, असेही तेली यांनी सांगितले. माजी आमदार परशुराम उपरकर, वैभव नाईक, खासदार विनायक राऊत तसेच अन्य नेते हे नेहमी गावात जात होते. मात्र, दगड मारा, म्हणून कोण सांगत नव्हते. स्थायी समितीला माझा विरोध नाही. पण मग समितीचे अधिकारी तुमच्याबरोबर का आले नाहीत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
भाजप-सेनेत संभ्रमावस्था
राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांची आरोंदा जेटीच्या विरोधात भूमिका स्पष्ट होती, मात्र राज्यात सत्ता येताच ठोस भूमिका घेण्यात या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.