‘जंक फूडचे फॅड, करी आरोग्य बॅड’
By Admin | Updated: June 8, 2015 22:40 IST2015-06-08T22:40:39+5:302015-06-08T22:40:39+5:30
प्रत्यक्षात जंक फूड हे फॅड असले तरी ते आरोग्यासाठी किती बॅड आहे, हे जंक फूड सातत्याने खाऊन चाळीशी गाठलेल्या तरुणांना विचारा. त्यांना पोटाचे विकार होतात.

‘जंक फूडचे फॅड, करी आरोग्य बॅड’
जान्हवी मोर्ये
आपल्या देशातील लोकांच्या पोटात एक अजब शक्ती आहे. त्यांनी काही खाल्ले तरी त्यांना चांगले पचविता येते, अशी बिरुदे भारतीय नेहमीच मिरविताना दिसतात. एका इंग्रजी कादंबरीत तर, भिकाऱ्यांची पचन यंत्रणा चांगलीच मजबूत असते. उष्टे, शिळे खाऊनही ते कसे काय जगतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. हे सगळे सांगण्याचे कारण आपले जीवनमान बदलत असताना गावेही शहरे होऊ लागली. शहरीकरणाचा झपाटा वाढू लागला. त्यात ह्युमन लाइफ फास्ट झाले. विशेषत: मेट्रो सिटीत जंक फूडची चलती सुरू झाली. पाश्चिमात्यांच्या फॅशनसोबत त्यांच्या खाण्याच्या सवयी अंगी बाळगण्याचे फॅड सुरू झाले. सध्या ‘मॅगी’ या इन्स्टंट फूडची अर्थात दोन मिनिट... अशी जाहिरात करणारा चित्रपटांचा बादशहा अमिताभ बच्चन, सौंदर्याची राणी माधुरी दीक्षित यांच्यासह मॅगीचे उत्पादन करणारी नेस्ले कंपनी चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे बाजारातील इतर फास्ट इन्स्टंट फूडच्या उत्पादन कंपन्यांसह त्यांच्या जाहिराती करणाऱ्यांच्या पोटात चांगलाच गोळा उठला आहे. मॅगी खायची कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी आपल्या मराठमोळ्या आणि भाषिक व प्रांतिक विविधता असलेल्या देशात नाश्ता आणि इतर पदार्थांची काय कमी आहे का? तर त्याचे उत्तर नाही, असे येते. डोसा, इडली, परोठा, कांदेपोहे याला तोड नसली तरी ते सोबत घेऊन जाणाऱ्या कॉर्पोरेट तरुणाईला इतरांच्या समोर थोडे बॅकवर्ड झाल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात जंक फूड हे फॅड असले तरी ते आरोग्यासाठी किती बॅड आहे, हे जंक फूड सातत्याने खाऊन चाळीशी गाठलेल्या तरुणांना विचारा. त्यांना पोटाचे विकार होतात. मग, आपले पदार्थ आणि नाश्ताच चांगला, असे म्हणण्याची वेळ येते. जंक फूडविषयी तरु णाईचे काय मत आहे. त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या...
फास्ट फूडवर बंदी आणा
आसनगावमधील महाविद्यालयात सिव्हील इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या ओंकार जोशीने सांगितले की, मला जंक फूड खायला आवडत नाही. घरी तयार केलेले पदार्थ मी आवडीने खातो. जंक फूड मी खात नाही. ते चटपटीत असतात. त्यांचे पॅकिंग आकर्षक असते. त्याला लोक भुलतात. भारतीय पदार्थांमध्ये सत्त्व आहे. त्यात चटपटीतपणा, आकर्षक पॅकिंग नसल्याने त्यांच्याकडे खवय्ये आकर्षित होत नाहीत त्यामुळे तरुण खवय्या त्याला टाळतो. त्यामुळे भारतीय खाद्यपदार्थ बाजारपेठेत अर्थात जागतिक बाजारपेठेत जम बसवू शकलेले नाहीत. चायनीज डिश कधीतरी खायला आवडते. एक चेंज म्हणून मी कधीतरी ती खातो. आपल्याला दीर्घायुषी व्हायचे असेल तर फास्ट फूडवर बंदी आणायला हवी. त्याशिवाय, दुसरा पर्याय नाही. फास्ट व जंक फूडला आळा घालायचे मनापासून ठरविले तरच ते शक्य होऊ शकते. घरगुती पौष्टिक पदार्थांचा आपण व्यावसायिक दृष्टीने विचार करायला हवा.
जिभेवरील नियंत्रण गरजेचे
बिर्ला महाविद्यालयातील बारावीचा विद्यार्थी गिरीश कामत याने सांगितले की, कोणताही खाद्यपदार्थ असो, जंक फूड अथवा फास्ट फूड तो बंद करण्यासाठी आपल्याला आपल्या जिभेवर नियंत्रण मिळविता आले पाहिजे. लहानपणापासून आईवडील ज्या खाद्यपदार्थांची चव जिभेला लावतात, तेच खाद्यपदार्थ मुले-मुली खातात. त्यांच्या खाण्याच्या सवयी काय आहेत, त्यातून त्यांच्या आवडीनिवडी निश्चित होतात. तसाच त्यांच्या आहाराचा कल पाहावयास मिळतो. फास्ट फूड हे केव्हाही, कुठेही व कमी किमतीत उपलब्ध होते. आहारातील तोचतोचपणा टाळण्यासाठी फास्ट फूडकडे अनेक जण वळतात. काहींना घरी स्वयंपाक करायला वेळ नसतो. अशा वेळी आॅफिसमधून घरी जातानाच पार्सल नेले जाते व मुलांना अशाच प्रकारे फास्ट फूड खाण्याची सवय लागते. गुटखा शरीराला व आरोग्याला घातक आहे. त्यामुळे सरकारने गुटखा विक्रीवर बंदी आणली. तरी तो बाजारात ब्लॅकने मिळतो. आजही गुटख्याचा साठा पोलिसांनी पकडला... अशा बातम्या पेपरमध्ये येतात. भारतीय आहारशास्त्र अत्यंत चांगले आणि उत्तम आहे. त्याचा अभ्यास करून ते जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न केला आहे का? होममेड फूडला ग्लॅमर मिळाले तर जंक व फास्ट फूडचा पाया ढिला होईल. घरच्या जेवणात अजिनोमोटो नसल्याने जेवणातील मिठाची गरज कमी होते. अजिनोमोटो जेवणातील २५ टक्के मिठाची गरज भागविते. होममेडला बाजारपेठ मिळाली तर पोहेसुद्धा बर्गरच्या लोकप्रियतेप्रमाणे बाजारातील मॉल्समध्ये विकले जातील, यात काही शंका नाही.
पॅकबंद खाण्यावर बंदी हवी
सानपाडा येथील ओरिएंटल कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालयामध्ये फार्मसीच्या चौथ्या वर्षाला असलेल्या सोनाली कानडे हिने सांगितले की, आज १२ वर्षांनंतर मॅगीचा बाऊ केला जात आहे. त्याआधी व परवानगी घेताना त्यांना कशाच्या आधारे परवाने दिले गेले? सरकारी यंत्रणा भ्रष्ट होती का? जाहिरात करणारे तारेतारकांनीही यातून धडा घेतला पाहिजे. हे सगळे प्रश्न आज उपस्थित केले जात असले तरी जंक फूड व फास्ट फूड सर्रासपणे शहरातील नाक्यानाक्यांवर विकले जाते. त्यांनी कोणते परवाने घेतले आहेत. अन्न व औषध प्रशासन व स्थायिक स्वराज्य संस्था त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सरकारच्या आशीर्वादातूनच नाक्यानाक्यांवरील चायनीज कॉर्नर सुरू आहेत. कितीतरी चायनीजच्या गाड्या सार्वजनिक प्रसाधनगृहे, मुताऱ्या, खुल्या गटारांवर सुरू आहेत. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. पॅकबंद अथवा उघड्यावर विकल्या जाणाऱ्या अन्नातून पोट खराब होते. त्याला आळा घातला पाहिजे. घरातूनच नाश्ता, जेवण करून आपण बाहेर पडलो तर बाहेरच्या पदार्थांकडे आपली जीभ वळणार नाहीत. आपले मित्रमैत्रिणी बाहेर जाऊन खाणार असतील तर माझ्याकडे डबा आहे, असे सांगायलाही अनेकांना कमीपणाचे वाटते.