Join us  

शरद पवारांसोबत अचानक झालेल्या भेटीत आव्हाड म्हणाले साहेब चाव्या तयार आहेत, पवार म्हणाले मग उशीर कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 5:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रविवारी झालेल्या भेटीची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवर दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रविवारी झालेल्या भेटीची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवर दिली आहे. शरद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाची माहिती आव्हाड यांनी शेअर केली आहे. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मुक्कामासाठी म्हाडाकडून घरं उपलब्ध करुन देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आव्हाडांनी दिलेलं आश्वासन पवार यांना लक्षात होतं आणि त्याची विचारणा पवारांनी केली. त्यावर आव्हाडांनी घरांच्या चाव्या तयार असल्याचं शरद पवार यांना सांगितलं. 

नेमकं काय घडलं?"काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला… कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला", असं ट्विट जितेंद आव्हाड यांनी केलं आहे. शरद पवारांनी विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "मी म्हटलं आपल्या तारखेची वाट पाहातोय. साहेब म्हणाले ठिक आहे. या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करुन टाकू, पहिलं त्यांना घरं दिली पाहिजेत", असं दुसरं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी शरद पवारांसोबत झालेल्या भेटीचा फोटो देखील ट्विट केला आहे. शरद पवार यांच्यावर गेल्या महिन्यात दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यात सल्ला दिला होता. ते राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नव्हते. शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असून ते त्यांच्या कामाला पहिल्यासारखी सुरुवात करतील, असं ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलं होतं. 

मुंबईतील टाटा कर्करोग निदान रुग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना राहण्याची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून 'म्हाडा'ने त्यांचे १०० प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसटाटाकर्करोगम्हाडा