Join us  

"बाबासाहेब पुरंदरेंनींच खोटा अन् चुकीचा इतिहास मांडण्याची सुरुवात केली"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 11:37 PM

जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेचं स्वागत करताना बाबासाहेब पुरंदरेंनीच चुकीचा इतिहास मांडण्याची पद्धत सुरू केल्याचं म्हटलं आहे

मुंबई - महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचा शुभारंभ होताच वादाला सुरुवात झाली आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील भूमिका आणि कथानकावरुन शिवप्रेमींनी सोशल मीडियावर आवाज उठवला होता. त्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची तोडफोड केली जात आहे. स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही करायचे ? इतिहासाची तोडफोड करून चित्रपट काढाल, तर याद राखा, माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दात संभाजीराजे यांनी परखड मत मांडलं आहे. त्यानंतर, आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेचं स्वागत करताना बाबासाहेब पुरंदरेंनीच चुकीचा इतिहास मांडण्याची पद्धत सुरू केल्याचं म्हटलं आहे. मी मवाळ, तसाच कडकही आहे. मीच आडवा येणार अशा चित्रपटांच्या विरोधात. मी छत्रपती घराण्यात जन्माला आलोय, हे अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपट निर्मात्यांना दिला. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही ते बोलले. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढताना काही बाबी या पूर्वनियोजित कटातून होत असल्याचेही दिसून येत आहे. त्याविरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. एकीकडे संभाजीराजेंनी कडक भूमिका घेतल्यानंतर आता त्यांना इतरही नेत्यांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन संभाजीराजेंच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. 

महाराष्ट्रात शिवाजी महराजांचा चुकीचा, खोटा, इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे ह्यांनी सुरु केली. जाणता राजा हे महानाट्य हे त्याचे एक रुप. कारण त्यांचे लिखित पुस्तक होतेच तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीत काहीजण करत आहेत. आम्ही विरोध करुच पण संभाजीराजे ह्यांच्या रुपाने एक आवाज मिळाला, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन म्हटले आहे. 

मराठाचं मराठी का करता?

अलीकडच्या काळात मराठा शब्दाऐवजी जाणिवपूर्वक मराठी या शब्दाचा भर दिला जातो. शिवकाळात मराठी लोक हा शब्दच नव्हता. मराठा साम्राज्य आहे, ते कशाला बदलताय शब्द. चुकीचा शब्द प्रचलित केला जातोय, त्याला आमचा विरोध आहे. लोकांना आवडते म्हणून काहीही करायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भारतीय सैन्यात मराठा लाइफ इन्फ्रन्ट्री रेजिमेंट आहे. त्यात बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, अशा घोषणा दिल्या जातात. अशा महापुरूषाच्या नावाने इतर कुठल्याच रेजिमेंटमध्ये नाव घेतले जात नाही. त्यामुळे आपल्या मराठा शब्दाला एक इतिहास असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत

टॅग्स :जितेंद्र आव्हाडबाबासाहेब पुरंदरेसंभाजी राजे छत्रपती