बीएसयूपी, दोस्तीच्या सात हजार घरांची तपासणी?
By Admin | Updated: June 15, 2015 23:10 IST2015-06-15T23:10:25+5:302015-06-15T23:10:25+5:30
झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत ठाणे महापालिकेने बीएसयुपीच्या घरांची निर्मिती करून ठाणेकरांना हक्काची घरे दिली आहेत.

बीएसयूपी, दोस्तीच्या सात हजार घरांची तपासणी?
ठाणे : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत ठाणे महापालिकेने बीएसयुपीच्या घरांची निर्मिती करून ठाणेकरांना हक्काची घरे दिली आहेत. तसेच धोकादायक, अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचेही दोस्तीच्या रेंटल हाऊसिंगच्या घरांत पुनर्वसन केले आहे. परंतु, हक्काची आणि तात्पुरता निवारा मिळालेल्या याच रहिवाशांनी ही घरे दुसऱ्याला भाड्याने अथवा विकत दिल्याचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळेच आता या ७ हजार घरांच्या झडतीचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यानुसार, या घरांची तपासणी करण्यासाठी भरारी आणि दक्षता पथक नेमून त्यामध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या रहिवाशांवर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित घरांवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसनाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने बीएसयुपीची योजना हाती घेऊन शहरातील तुळशीधाम, खारटन रोड, सिद्धार्थनगर, महात्मा फुलेनगर येथे बीएसयुपीची घरे बांधून दिली आहेत. या योजनेंतर्गत पालिकेने आतापर्यंत सुमारे ७ हजार घरांची निर्मिती करून अनधिकृत बांधकामांत राहणाऱ्यांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले आहे. परंतु, आता यातील काही रहिवाशांनी हीच घरे दुसऱ्यांना भाडेतत्त्वावर अथवा विकूनही टाकल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. तसेच तीन वर्षांपासून पालिका शहरातील अतिधोकादायक अथवा पावसाळ्यात पडणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल हाऊसिंगमध्ये करीत आहे. यामध्ये आतापर्यंत १ हजारांहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन केले असून येथे एकूण ५ हजार रहिवासी राहत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ही घरेही भाड्याने दिली जात असल्याचे पालिकेने मान्य केले आहे. परंतु, भविष्यात निर्माण होणाऱ्या घरांवर आपला क्लेम राहावा म्हणून काहींनी या घरांवर ताबा ठेवला आहे. एकूणच आता बीएसयूपी आणि दोस्ती रेंटलच्या घरांचा अहवाल तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. तसेच यासाठी भरारी आणि दक्षता पथकाची निर्मिती केली जाणार असून प्रत्येक पथकात १० जणांचा समावेश असणार आहे. या दोनही टीम या घरांची तपासणी करणार असून ज्या ठिकाणी घरे भाड्याने दिली आहेत, अथवा विकली आहेत, अशांवर सरकारी मालमत्तेचा अपहार केला म्हणून घरमालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून घरेही जप्त केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अतिधोकादायक, धोकादायक अथवा एखाद्या वेळेस इमारत पडली तर तेथील रहिवाशांना महापालिका दोस्तीच्या रेंटल हाऊसिंगच्या घरात स्थलातंरित करीत आहे. परंतु, आता या घरांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरू झाल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. पालिकेने आता या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत. केवळ पाण्याच्या टाकीत लिकेज असल्याने हे दूषित पाणी येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाने मान्य केले आहे. त्यानुसार, त्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
दोस्तीच्या १४०० घरांमध्ये तीन वर्षांत पालिकेने आतापर्यंत ७०० हून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन केले आहे. परंतु, दरवर्षी हा आकडा वाढतच आहे. या इमारतींना पाणीपुरवठा करणाऱ्या एका टाकीची साफसफाई महापालिका प्रशासनाने आठवडाभरापूर्वी हाती घेतली होती.
त्या वेळी या टाकीत दूषित पाणी मिसळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे गळतीचा भाग शोधून प्रशासनाने त्या भागाची तातडीने दुरुस्ती केली आहे. तसेच दूषित पाण्याच्या पार्श्वभूमीवर इमारतींमधील अन्य टाक्यांचीही साफसफाई केली आहे.