प्रभाग समितीवरही सत्ताधाऱ्यांचाच प्रभाव
By Admin | Updated: June 17, 2015 00:10 IST2015-06-17T00:10:54+5:302015-06-17T00:10:54+5:30
महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांवर सामाजिक संघटनांच्या प्रत्येकी तीन सदस्यांची नियुक्ती केली जाते. पालिकेच्या स्थापनेपासून सदस्यपदांवर

प्रभाग समितीवरही सत्ताधाऱ्यांचाच प्रभाव
नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांवर सामाजिक संघटनांच्या प्रत्येकी तीन सदस्यांची नियुक्ती केली जाते. पालिकेच्या स्थापनेपासून सदस्यपदांवर सत्ताधारी पक्षाचा प्रभाव राहिला आहे. सदस्य म्हणून राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांची वर्णी लागत असल्याचे निदर्शनास आले असून या विषयावर विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध समित्यांची स्थापना करण्यात येते. या समित्यांमध्ये प्रभाग समितीला सर्वाधिक महत्त्व आहे. शहरात सहा प्रभाग समित्या असून त्यावर नगरसेवकांव्यतिरिक्त सामाजिक संघटनांच्या तीन सदस्यांची नियुक्ती केली जाते. नियमाप्रमाणे नियुक्ती करण्यात येणाऱ्या प्रतिनिधींची ‘सामाजिक संस्था मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम १९५०’ किंवा ‘नोंदणी अधिनियम १८६०’ अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक असते. सदर संस्थांच्या तीन वर्षांचे लेखा परीक्षण झालेले असावे, लेखा विवरण व कामाचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेला असावा. संघटनांनी भारतीय संविधानातील अनुसूची १२ मध्ये नागरिकांची जी कामे दर्शविली आहेत त्यांच्याशी संबंधित कमीत कमी एक प्रकल्प सदस्यांच्या नामनिर्देशनाच्या आधीच्या तीन वर्षात पूर्ण केलेला असावा अशी अट आहे. नियुक्ती करण्यात येणारा सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसावा. केंद्र शासन, कोणतीही महापालिका किंवा नगरपरिषदा यांच्या सेवेत नसणाऱ्यांचीच या पदावर नियुक्ती केली जाते.
स्वीकृत सदस्य हा राजकीय पक्षाचा सदस्य नसावा असा संकेत आहे. परंतु आतापर्यंतच्या सदस्यांवर नजर टाकली तर त्यामधील अनेक जण हे सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाशी जवळीक असणारेच असल्याचे निदर्शनास येते. मागील पंचवार्षिकमध्ये ब प्रभाग समितीवर असणारे डी. डी. कोलते हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवारही होते. क प्रभाग समितीवरील पीयूष पटेल हेही माजी उपमहापौर भरत नखाते यांचे जवळचे सहकारी आहेत. ड प्रभाग समितीवरील गणेश शिंदे, मुनावर पटेलही राष्ट्रवादीशी संबंधित असून पटेल नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. प्रभाग समिती सदस्य पदासाठी अर्ज मागविले जातात. आलेल्या अर्जदारांमधून नगरसेवक नाव निश्चित करतात. एकमताने नाव निश्चित झाले नाही तर बहुमताने नाव निश्चित केले जाते. पालिकेत यापूर्वी राष्ट्रवादीचे बहुमत असल्यामुळे त्यांच्याशी जवळीक असणाऱ्यांचीच वर्णी लागली असून किमान यावेळीतरी यामध्ये बदल व्हावा अशी मागणी विरोधी पक्ष करू लागले आहेत.
वृृक्ष प्राधिकरणावरही राष्ट्रवादीच
- प्रभाग समित्यांबरोबर वृक्ष प्राधिकरणावरही राष्ट्रवादीचाच प्रभाव आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांचे बंधू ज्ञानेश्वर नाईक व स्वीय सहायक जगदीश लांगी हे मागील काही वर्षे वृक्ष प्राधिकरणावर सदस्य आहेत. शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी प्रभाग समिती व वृक्ष प्राधिकरण नियुक्तीविषयी सर्वसाधारण सभेमध्ये आवाज उठविण्याचा इशारा दिला असून याविषयी लेखी प्रश्नही उपस्थित केला आहे.