उद्योगांना जागा मिळणे गरजेचे

By Admin | Updated: April 16, 2015 22:47 IST2015-04-16T22:47:05+5:302015-04-16T22:47:05+5:30

सध्या महाराष्ट्रात उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. उद्योगधंद्यांच्या विकासाकरिता येथील वातावरण पूरकही आहे.

Industry needs to get seats | उद्योगांना जागा मिळणे गरजेचे

उद्योगांना जागा मिळणे गरजेचे

पनवेल : सध्या महाराष्ट्रात उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. उद्योगधंद्यांच्या विकासाकरिता येथील वातावरण पूरकही आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातकडे पळविले जात असल्याची चर्चा सतत ऐकायला मिळते. कोकण पट्ट्यातील रसायनी, पाताळगंगा या महत्त्वाच्या दोन एमआयडीसीमधील समस्या तसेच शासनाचे धोरण, सुरक्षा यंत्रणांवर एमआयडीसी कोकण परिमंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश झंजाड यांच्याशी सविस्तर चर्चा लोकमत व्यासपीठावर नुकतीच करण्यात आली.
नवी मुंबईला लागूनच असलेल्या पाताळगंगा, रसायनी एमआयडीसीमधील विविध विषयांवर लोकमतच्या व्यासपीठावर बुधवारी चर्चा करण्यात आली. त्यात पाताळगंगा नदीचे प्रदूषण, कारखान्यातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा, सुरक्षा यंत्रणा, उद्योगधंद्यामधील वाढती स्पर्धा, तसेच उद्योगधंद्यांना जागा उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेतील वेळखाऊपणा, कारखान्यातील सांडपाण्याचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली.
पाताळगंगा, रसायनी एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था करणे आवश्यक बनले आहे. केवळ बस सेवेवर अवलंबून राहावे लागत असून यासाठी प्रत्येक कारखान्याने कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरु केली आहे. या ठिकाणच्या पाताळगंगा नदीत कारखान्यातील प्रदूषित पाणी प्रक्रिया करून सोडले जात असल्याबाबत देखरेख करण्यासाठी एनईवो ही एजन्सी काम करते.
सुरक्षेसंदर्भात फायर सेफ्टी, मशीन सेफ्टी, तसेच प्रत्येक फॅक्टरीत इन्स्पेक्टर नियुक्त केलेला असतो, तसेच कामगारांच्या हक्कासंदर्भातही यानिमित्ताने चर्चा करण्यात आली. त्यामध्ये उद्योगधंदे थांबविण्यापूर्वी त्या कामगारांना विश्वासात घेणे महत्त्वाचे असल्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.
लोकमत व्यासपीठावर विविध विषयांवर चर्चा करताना एमआयडीसीचे कोकण परिमंडळचे अधीक्षक अभियंता राजेश झंजाड, उप अभियंता श्रीकांत राऊत, सहाय्यक अभियंता अविनाश गाधाडे, लोकमत मुंबईचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर हे उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

च्उद्योगधंदे थांबविण्यापूर्वी त्या कामगारांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे, तसेच महाराष्ट्रात उद्योगधंद्यांना शासनाचे चांगलेच सहकार्य मिळते. स्थानिकांना विश्वासात घेतल्यास, भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. २४ तास वीजपुरवठा, पाण्याची उपलब्धता हे उद्योगाच्या दृष्टीने चांगले असल्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

च्उद्योगधंद्यांना जास्तीत जास्त जागा उपलब्ध झाल्यास उद्योगधंद्यांना चालना मिळू शकेल आणि त्यासाठी शासन आणि स्थानिक शेतकऱ्यांत समन्वय असणे आवश्यक आहे. नवी मुंबई परिसराचा विकास पाहता याचा फायदा उद्योगांना भविष्यात होणार आहे. मात्र नवे उद्योग उभे राहताना, स्थानिकांचाही विचार होणे गरजेचे असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Industry needs to get seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.