खोपोली शहरात गुन्हेगारी वाढतेय
By Admin | Updated: March 11, 2015 22:17 IST2015-03-11T22:17:44+5:302015-03-11T22:17:44+5:30
मुंबई व पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खोपोलीची ओळख. मात्र आता घरफोड्या, लुटमार अशी शहराची ओळख होऊ लागली आहे

खोपोली शहरात गुन्हेगारी वाढतेय
खालापूर : मुंबई व पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खोपोलीची ओळख. मात्र आता घरफोड्या, लुटमार अशी शहराची ओळख होऊ लागली आहे. एक्स्प्रेस-वेवर वाहनचालकांना लुबाडण्याच्या घटना परिसरात वाढल्या आहेत.
शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कारखानदारीमुळे गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असून तुलनेने पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे परिसरात पोलीस यंत्रणा सक्षम करतानाच कठोर उपाययोजनांचीही गरज आहे.
खालापूर तालुक्यातील कारखानदारीमुळे हा पट्टा औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. परिसरातील लोकवस्ती वाढत आहे. मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग तसेच रेल्वेने हे शहर मुंबईला जोडले गेल्याने शहराचे महत्त्व आणखी वाढले. खोपोलीत स्वतंत्र पोलीस ठाणे असले तरी शहराचा अवाढव्य कारभार सांभाळताना तालुक्याच्या ग्रामीण भागावरही खोपोली पोलिसांना लक्ष ठेवावे लागते. दु्रतगती महामार्गावरून सतत जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारीही खोपोली पोलिसांना पार पाडावी लागते.
शहरात घडणारे गुन्हे, व्हीआयपींची सुरक्षा, विविध आंदोलने, निवडणुका, सण, उत्सव या साऱ्यांचा ताण संख्येने कमी असलेल्या पोलिसांवर पडतो. मुंबईत गुन्हे करून चोर द्रुतगती मार्गावरून पसार होत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. दोन प्रमुख महामार्ग असल्याने अपघातांची संख्या मोठी आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांकडून पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)