रांगा लावण्यापेक्षा सुविधा अंमलात आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 01:02 AM2019-11-21T01:02:14+5:302019-11-21T01:02:19+5:30

रेल्वे प्रशासनाने ‘माय लेफ्ट इज माय राइट’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून लोकलमध्ये चढ-उतार करताना होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी आशा त्यांना आहे.

Implement features rather than queue | रांगा लावण्यापेक्षा सुविधा अंमलात आणा

रांगा लावण्यापेक्षा सुविधा अंमलात आणा

Next

रेल्वे प्रशासनाने ‘माय लेफ्ट इज माय राइट’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून लोकलमध्ये चढ-उतार करताना होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी आशा त्यांना आहे. कमी वेळ फलाटावर थांबणाऱ्या लोकलसाठी हा उपक्रम यशस्वी होईल का, याबाबत साशंकता आहे. त्यापेक्षा रेल्वे प्रशासनाने वेळापत्रकानुसार लोकल चालविणे, पायाभूत सुविधांचा विस्तार करीत गाड्यांची संख्या आणि वक्तशीरपणा वाढविण्यावर भर द्यायला हवा, अशी भूमिका ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’ च्या व्यासपीठावर मांडली. रेल्वेकडून अनेक सुविधा, उपक्रम सुरू होतात. मात्र त्यांची अंमलबजावली केली जात नाही. ती जर झाली, तर मोठा फरक पडेल आणि रांगा लावण्याची वेळही कदाचित येणार नाही, अशी वाचकांची भूमिका आहे.

स्थानकात रांगा लावण्यापेक्षा सेवा सुधारा!
मुंबई उपनगरीय लोकलमधून जवळपास ८० लाख प्रवासी २४ तास घड्याळाच्या काट्यावर प्रवास करीत असतात. अशा वेळी रांगेत उभे राहून लोकलमध्ये चढणे - उतरणे हे कायापालट ठरू शकते. त्यातून लोकलचे स्टेशनवरील थांबे हे एक-दोन मिनिटांचे असतात. तेवढ्या कालावधीत रांगा लावून चढण्याइतका संयम प्रवासी दाखवतील असे वाटत नाही. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या बाबतीत हा प्रयोग ठीक आहे; पण खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवाशांची उतरतानाच चेंगराचेंगरी होते, मग रांगा लावून चढणाऱ्यांना कितीसा वेळ मिळेल? रांगा लागल्या तरी पोलीस बळ कितीसे पुरे पडेल, याबाबतीत शंकाच आहे. त्यामुळे लोकलमध्ये चढण्यासाठी रांगा लावाव्यात, हे जरी कागदावर चांगले वाटत असले, तरी अशी
व्यवस्था कितपत उपयोगी पडेल याबाबतीत साशंकताच आहे. वास्तविक गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई परिसरात दळणवळणाच्या वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या गेल्या पाहिजेत.
- अनंत बोरसे, शहापूर

रांगेने प्रश्न सुटणार नाहीत
लोकल प्रवाशांना रांगा लावून डब्यात चढण्याचे प्रयोग रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाने सुरू केले आहेत. ते स्वागतार्ह आहेत. बदलापूरसारख्या स्थानकात हा प्रयोग महिला प्रवाशांनी यापूर्वी स्वयंशिस्तीने यशस्वी केला होता. मात्र, प्रयोगात सातत्य ठेवणे अत्यंत अवघड असल्याने ते काही काळातच बंद होतात. मुळात अलीकडे प्रत्येक स्थानकाच्या प्रवासी संख्येत बदल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून प्रवास सुरू करणाºया लोकल प्रवाशांची संख्या कमी होत आहे. तर, बदलापूर, कल्याण, दिवा, ठाणे इत्यादी स्थानकांची प्रवासी संख्या वाढते आहे. लोकल वेळेवर धावल्या तर स्थानकात गर्दी वाढत नाही. मात्र लोकल उशिरा धावल्यास स्थानके गर्दीने तुडुंब भरतात. अशावेळी रांगा वगैरे सर्व प्रयोग फसतात, हे सत्य आहे. मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांसह नवी मुंबई येथील सर्व बँका, महापालिका, राज्य व केंद्र सरकारी कार्यालये, खासगी आस्थापना व मोठ्या शिक्षण संस्था यांच्या कार्यालयीन वेळांमध्ये एक ते दीड तास बदल केल्यास गर्दीच्या वेळेतील दोन्ही दिशेकडील मार्गावर रेल्वे प्रवास कमी गर्दीचा होईल. रांगेचा प्रयोगही यशस्वी होईल. गर्दीच्या काही रेल्वे स्थानकांत एका विशिष्ट पातळीवर गर्दी झाल्यास प्रवाशांना स्थानकात काही काळ प्रवेश न देण्यासाठी उपाय करावेत. रेल्वेव्यतिरिक्त अन्य पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम कराव्यात. तेव्हाच रेल्वेवरील ताण कमी होईल.
- मनोहर शेलार, माजी सदस्य,
उपनगरी रेल्वे सल्लागार समिती, मध्य रेल्वे

प्रवाशांची मते विचारात घ्यावीत!
रेल्वे प्रशासन प्रवासी सेवेसाठी नवनवीन प्रयोग करते, त्यांचे स्वागत करायला हवे. मुंबईबाहेर जाणाºया मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवेश करताना रांगा लावण्याचा प्रयोग करून झाल्यावर तसाच प्रयोग लोकलसाठी करण्याचा घाट रेल्वे प्रशासन घालत आहे. लोकल प्रत्येक स्थानकावर जेमतेम १५/२० सेकंद थांबते. सकाळ, संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळी प्रत्येक दरवाजातून अंदाजे चाळीस प्रवासी चढ-उतर करतात. उतरणारे प्रवासी फलाटावर उतरल्याशिवाय रांगा लावून उभे असलेले प्रवासी एखाद्या दरवाजातून उरलेल्या वेळेत आत प्रवेश घेऊ शकतील का? पोलीस दल प्रत्येक दरवाजावर रांगा लावण्याची दक्षता घेणार म्हणजे किमान तीन दरवाजे असणाºया बारा डब्यांच्या लोकलसाठी फलाटाच्या एका दिशेस सुमारे चाळीस व दुतर्फा ऐंशी, असे मुंबईतील पश्चिम, मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर पोलिसांची नेमणूक या कामासाठी व्यवहार्य आहे का याचा व त्यापायी येणाºया खर्चाचा, वेळेचा विचार रेल्वे प्रशासनाने केला असावा. कल्याण, अंबरनाथ किंवा वसई, विरार येथे जाणारे प्रवासी फलाटावर आलेल्या पहिल्या लोकलमध्ये शिरू न शकल्यास पुढील लोकल येईपर्यंत तेथे कसे काय रांगेत उभे राहणार? याचाही विचार रेल्वेने करायला हवा. त्यापेक्षा प्रत्येक लोकल फलाटावर किमान गर्दीच्या वेळी सर्वेक्षण करावे, प्रवाशांची मते आजमावून घ्यावीत आणि सुरुवातीस काही स्थानकांवर त्याप्रमाणे प्रयोग राबवून पुढील कार्यवाहीचे निर्णय घ्यावेत, जे प्रवाशांना कायमस्वरूपी फार उपयुक्त ठरतील.
- राजन पांजरी, जोगेश्वरी.

बदलापूर, ठाण्यात रांगेची
प्रायोगिक सुरुवात करावी
प्रायोगिक तत्त्वावर लोकलमध्ये रांगा लावून चढण्याचे व त्यासाठी रेल्वे पोलीस दलाचे प्रयत्न स्तुत्य आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयत्न करून बघावयास हरकत नाही. बदलापूर, कल्याण, ठाणे यांसारख्या स्टेशनवर प्रवाशांना शिस्तीचे वावडे आहेत. उतरणाºया प्रवाशांना आधी उतरू देण्याचेदेखील सौजन्य हे काही प्रवासी दाखवत नाहीत. दोन-चार महिन्यांपूर्वीच विदर्भातून लहान बाळाच्या गंभीर आजारावरील उपचारासाठी मुंबईत आलेल्या दाम्पत्याच्या लहान बाळाचा परळ स्टेशनवर लोकलमधून उतरताना धक्काबुक्कीने गंभीर इजा होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. रोजच असे अनेक प्रसंग उद्भवत असतात. प्रवाशांच्या शिस्तीवर कायद्याचा बडगा उभारणे गरजेचे आहे. प्रवासातील दुर्घटनांना लोकलसेवेतील विलंब व पुरेसे लोकल फेºया नसणे या बाबी खºया असल्या तरी लोकलमध्ये चढण्या-उतरण्यातील प्रवाशांची बेशिस्तदेखील बºयाचअंशी अशा अपघातांना जबाबदार असते, हे विसरून चालणार नाही. कायद्याच्या बडग्यापेक्षा प्रवाशांची स्वयंशिस्त प्रभावी ठरते. बेस्टच्या प्रवासात प्रवाशांच्या रांगेमुळे होणाºया अपघातांचे प्रमाण नगण्य आहे. त्या मानाने लोकल सेवेचा व्याप अवाढव्य आहे. पण, प्रवाशांच्या हितासाठी काही कठोर पावले रेल्वे सुरक्षा दलांनी उचलणे गरजेचे बनले आहे.
- राजकुमार पाटील, मुरबाड

पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज
उपनगरी लोकलने सकाळ-सायंकाळ प्रवास करणाºया प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. सर्वच नोकरदारांना सकाळी वेळेत आॅफिस गाठायची घाई असते तर संध्याकाळी घर! प्रवाशांच्या प्रमाणात लोकल अतिशय कमी आहेत. त्यामुळे गर्दीने ओसंडणाºया या लोकलमध्ये प्रवेश मिळावा म्हणून जीवावर उदार होऊन प्रवासी लोकलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. पण प्रवाशांनी रांगेतून लोकलमध्ये प्रवास करावा, अशी योजना रेल्वे पोलीस दलाने आखली आहे. मात्र लोकलची अनियमितता आणि मुळातच अपुºया लोकलमुळे गर्दीचा प्रचंड ताण त्यामुळे घाईत असणारा कुणी प्रवासी रांगेत राहून प्रवास करील असे वाटत नाही. त्याऐवजी रेल्वे खात्याने जादा लोकल, अधिक डबे व दोन लोकलमधील अंतर कमी करून लोकलचे प्रमाण वाढविण्यासाठी, फलाटांची लांबी वाढविण्यासाठी व प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक त्या सोयी देण्यासाठी प्रयत्न करावेत.
- मुरलीधर धंबा, डोंबिवली

कल्पना चांगली; पण मुंबईत अशक्य!
रेल्वे म्हणजे लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी. सध्या आपण रेल्वेची आणि प्रवास करणाºया प्रवाशांची काय अवस्था होते, हे पाहतो. लोकल स्थानकावर आली की आतील प्रवासी उतरण्याआधीच डब्यात चढणारे प्रवासी चढू लागतात. त्यातच दारात उभे असणारे प्रवासी जागा अडवून असतात. समजा, रांग जरी लावली तरी गाडी केवळ २० सेकंद फलाटावर थांबते. रांग लावल्यास सर्व प्रवासी प्रत्येक डब्यात चढायला दोन-चार मिनिटे लागतील. यामुळे रेल्वेचे सर्व वेळापत्रकच बिघडून जाईल. ही शिस्तीची रांग फक्त ज्या स्थानकावरून लोकल सुटतात त्या ठिकाणासाठी एकवेळ योग्य होईल. आता या अफाट गर्दीच्या प्रवाशांना रांगेची शिस्त लावणे अशक्यच आहे. ही कल्पना चांगली असली तरी आपल्या मुंबईत वास्तवात येणे शक्य नाही.
- अरुण खटावकर, लालबाग

स्वयंशिस्त महत्त्वाची
प्रत्येक उपनगरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची चढताना-उतरताना होणारी गर्दी, धक्काबुक्की टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ‘माय लेफ्ट इज माय राइट’ या संकल्पनेतून प्रवाशांना रांग लावण्याचे आवाहन केले जात आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने हा उपक्रम राबवला जात आहे. त्याला प्रवाशांकडून प्रतिसादही मिळतो आहे. पश्चिम रेल्वेच्या भार्इंदर, बोरीवली तर मध्य रेल्वेच्या दादर, कल्याण, बदलापूर, शहाड इत्यादी रेल्वे स्थानकांवर प्रवासी रांगा लावून लोकलमध्ये चढतात, ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र सुरुवातीची स्थानके सोडली तर इतर ठिकाणी रांगेचा हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत प्रवाशांच्या मनात साशंकता आहे.
- प्रदीप मोरे, अंधेरी

रांगेशिवाय चढणाऱ्यांना रोखा
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल गर्दीचा घोळ वाढतच आहे. यावर उपाय म्हणून प्रवाशांच्या रांगा लावण्याचा प्रयोग रेल्वे पोलीस दलाने सुरू केला आहे. गर्दीच्या वेळी होणारा खोळंबा पाहता रांगा लावून लोकलमध्ये चढणे शक्य होईल का ? याचा गांभीर्याने विचार करून प्रवास सुसह्य बनविण्यासाठी प्रयत्न करावा. रांगेशिवाय चढण्याचा प्रयत्न केला तर रोखण्यासाठी तात्पुरता पर्याय नाही, तर कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.
- कमलाकर जाधव, बोरीवली

गाड्यांच्या संख्येसह वक्तशीरपणा वाढवा!
एखादा संकल्प गाजावाजा करून राबवायचा आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या की तो अचानक रद्द करून मध्येच सोडून द्यायचा असे करण्यात रेल्वे प्रशासनाचा हातखंडा आहे. गाड्यांचे वेळापत्रक दर सहा महिन्यांनी बदलतात; मात्र प्रवाशांची सोय होत नाही. स्वच्छता मोहीम आखली; पण फलाट व परिसर स्वच्छ झाले नाहीत. प्रवासी आरक्षणाच्या सुविधा सुकर केल्या; पण प्रवाशांच्या रांगा तशाच लागतात. अत्याधुनिकता आणली; पण यशस्वी अंमलबजावणी नाही. एल्फिन्स्टनला चेंगरून प्रवासी दगावले; पण त्यांनी पायऱ्यांवर स्टिकर्स लावले! आता लोकलसाठी प्लॅटफॉर्मवर रांगा लावणार. प्रत्येक दरवाजातून उतरणारे आणि आत चढणारे प्रवासी काही सेकंद थांबणाºया लोकलमध्ये कशा व कोठे रांगा लावू शकतील, हा एक प्रश्नच आहे. स्त्रियांच्या डब्यांसमोर रांगा कोणी कशा लावाव्यात याबाबत अधिक स्पष्टता हवी. मुंबईतील चर्चगेट, सीएसएमटीवगळता दादर, परळ, गोरेगाव, अंधेरी, ठाणे, कुर्ला येथूनही लोकल्स सोडल्या जातात तेथे रांगा लावून ठरावीक वेळेत लोकल्स पकडणे प्रत्यक्षात शक्य आहे का? याचा विचार प्रशासनाने कार्यालयात बसून करू नये. कार्यालयात किंवा घरी पोहोचू इच्छिणाºया प्रवाशांना गाडीत प्रवेश न मिळाल्यास पुढील कामे कोलमडून पडतील. त्यामुळे रेल्वेने रांगा लावण्याचे प्रयोग करण्यापेक्षा गाड्यांची संख्या व गती वाढवावी, वक्तशीरपणा वाढवावा ज्यामुळे प्रवासी आपल्या वेळेप्रमाणे गाड्यांच्या वेळा जुळवून घेतील.
- स्नेहा राज, गोरेगाव.

लोकल फेºयांचे नियोजन करावे
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांत प्रवाशांना अत्यंत गर्दीचा सामना करीत लोकलमध्ये चढावे लागते, हे अगदी खरे आहे. यावर उपाय म्हणून रांगा लावून चढणे हे शक्यच होऊ शकणार नाही; कारण रांगा इतक्या लांबच लांब लागतील की स्टेशनच्या बाहेरपर्यंत पोहोचतील. आपल्या सर्वच स्टेशनच्या बाहेर इतके फेरीवाले असतात की प्रवाशांना चालणेही कठीण असते. अशा परिस्थितीत प्रवाशांमध्ये हाणामारी होऊ लागेल आणि रेल्वे सुरक्षा बल वाढवावे लागेल. तरी या रांगा लावण्यापेक्षा रेल्वेने लोकल फेºयांचे असे नियोजन करावे की ज्या प्रवाशांना इच्छित स्थानकात जायचे आहे त्यांनी त्याच लोकलने प्रवास करावा जसे की अंधेरीला जायचे आहे तर विरार-अंधेरी लोकल असेल त्याच गाडीत चढावे; दादर किंवा चर्चगेट गाडीत चढू नये आणि तसे वेळापत्रकाचे नियोजन रेल्वेने करावे.
- दयानंद पाटील, सचिव, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

वेळापत्रकानुसार लोकल हवी
लोकलमध्ये प्रवाशांना रांगेत चढण्यास लावणारा प्रयोग ज्याने कोणी करून आपल्या अकलेचे दिवे पाजळले आहेत त्याला खरेच भारताचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. तसेच त्याला मंजुरी देणाºयांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. कारण त्यांना लोकल ट्रेन आणि मेल, एक्स्प्रेस यांतील साधा फरक समजत नाही. विविध स्थानकांत रांगा लावण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागू शकेल याचा विचारच केला नाही. त्याऐवजी वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालवायचे प्रयत्न करावेत. गर्दी विभागण्यासाठी दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण या स्थानकांतून लोकल कशा चालविता येतील याचाही प्रयत्न करावा.
- अशोक पोहेकर, उल्हासनगर

Web Title: Implement features rather than queue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.