Join us  

Avani Tigress : अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 1:20 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. 

ठळक मुद्देअवनी वाघीण हत्या प्रकरणावरून सध्या राजकारण जोरात सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते.

मुंबई - गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. मात्र अवनी वाघीण हत्या प्रकरणावरून सध्या राजकारण जोरात सुरू आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल चढवला जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं तिला ठार केलं. या वाघिणीनं गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. तिनं आतापर्यंत 13 जणांचा जीव घेतला होता. अवनीच्या मृत्यूनंतर वन्यजीव प्रेमींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Avani Tigress : सुधीर मुनगंटीवार शिकारी माफियासोबत पैसे कमवत आहेत, गंभीर आरोप

शुक्रवारी टी-1 वाघिणीचा शोध सुरू होता. त्यावेळी ती शोध पथकाला दिसली. तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केली. त्यामुळे शार्प शूटर अजगर अलीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा मृत्यू झाला. रात्री एकच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. आता वाघिणीचा मृतदेह नागपूरला पाठवण्यात आला आहे. टी-1 वाघिणीचे दोन बछडे आहेत. त्यांचं वय 11 महिने इतकं आहे. त्यांना शोधण्याचं आव्हान आता वन विभागासमोर असेल.

नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून अथक प्रयत्न सुरू होते. वाघिणीला पकडण्यासाठी मध्यप्रदेशातून चार हत्ती आणण्यात आले होते. परंतु ते हत्तीही उधळले. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या एका पिसाळलेल्या हत्तीनेच महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. याशिवाय पाच शार्पशुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी व खासगी कर्मचाऱ्यांची फौज एवढेच नाही तर वाघिणीचा हवाई शोध घेण्यासाठी पॅरामिटर, इटालीयन कुत्रे आणण्यात आले होते. परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. या शोध मोहिमेत लाखो रूपयांचा चुराडा झाला. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामी लागली. खासगी शिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली होती. 

वाघिणीच्या दहशतीमुळे केलापूर, राळेगाव, कळंब तालुक्यातील शेतीची कामं जवळपास ठप्प झाली होती. या तालुक्यांमध्ये वाघिणीनं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पांढरकवडा वनविभागातील राळेगाव व पांढरकवडा वनपरीक्षेत्रात नरभक्षक वाघिणीची सर्वाधिक दहशत पाहायला मिळाली. सोयाबीनचे व कपाशीचे पीक शेतात असूनही ते काढण्यासाठी शेतात जायला कुणीही तयार नव्हतं. गावातील मजुरांना मजुरी मिळत नसल्यामुळे काही मजुरांनी गाव सोडून मजुरीसाठी दुसऱ्या गावाकडे धाव घेतली. लोणी, सराटी, बोराटी, भुलगड, खैरगाव, विहिरगाव, येडशी, तेजणी, जिरा, मिरा, सखी, झोटींगधरा, तेजनी आदी गावांमध्ये या नरभक्षक वाघिणीची चांगलीच दहशत होती.

टॅग्स :उद्धव ठाकरेअवनी वाघीणमुंबईशिवसेना