ठाणे जिल्ह्यात बेकायदेशीर रेती उपसा
By Admin | Updated: October 10, 2014 02:26 IST2014-10-10T02:26:59+5:302014-10-10T02:26:59+5:30
पर्यावरण संतुलनासाठी रेतीउपसा करण्यास कायद्याने बंदी असून न्यायालयाच्या आदेशाने तो सध्या बंद आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात राजरोसपणे बेकायदेशीर व अनधिकृत रेतीउपसा सुरू

ठाणे जिल्ह्यात बेकायदेशीर रेती उपसा
ठाणे : पर्यावरण संतुलनासाठी रेतीउपसा करण्यास कायद्याने बंदी असून न्यायालयाच्या आदेशाने तो सध्या बंद आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात राजरोसपणे बेकायदेशीर व अनधिकृत रेतीउपसा सुरू आहे. मोठमोठ्या डोझरसह संक्शन पंपाद्वारे कळवा, मुंब्रा आणि दिवा खाडीत बिनधास्तपणे चाळण सुरू आहे. परंतु, कारवाईसंदर्भात नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांचा अभाव दाखवणाऱ्या तहसीलदार कार्यालयांसह रेती गट प्रशासन सध्या निवडणूक कामाच्या बहाण्याखाली या रेती उत्खननाकडे दुर्लक्ष झाल्याने रेतीमाफियांना रान मोकळे झाले आहे.
या खाड्यांमध्ये अनेक डोझर, संक्शन पंप, बोटी जागोजागी रेती उत्खनन करीत आहेत. आचारसंहिता लागू होताच अनधिकृत रेती उत्खनन रात्रंदिवस सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे या आधीदेखील बेकायदेशीर मनमानी रेतीउपसा करण्यात आलेला असून तो आजतागायत आहे. या बेकायदेशीर रेती उत्खननाला वेळीच आळा घालण्याचे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी वेळोवेळी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत दिले. पण, प्रत्यक्षात मात्र त्यास आळा घालणे शक्य झाले नाही. यामुळे खाड्यांची चाळण होऊन पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास सुरू आहे. (प्रतिनिधी)