चालकांचे सिग्नलकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: January 21, 2015 22:38 IST2015-01-21T22:38:39+5:302015-01-21T22:38:39+5:30
पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये बेशिस्त वाहन चालकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पोलीस असतील तरच वाहने सिग्नलवर उभी केली जात आहेत.

चालकांचे सिग्नलकडे दुर्लक्ष
नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये बेशिस्त वाहन चालकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पोलीस असतील तरच वाहने सिग्नलवर उभी केली जात आहेत. पामबीच रोड व इतर अनेक ठिकाणी सिग्नलचे नियम धाब्यावर बसविले जात असून त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होवू लागले आहेत. वर्षभरात पोलिसांनी नियम तोडणाऱ्या तब्बल २२,९८५ जणांवर कारवाई केलेली आहे.
सिडकोने नवी मुंबई, पनवेल परिसराची रचना करताना चांगले रस्ते तयार केले आहेत. वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतूक कोंडी व अपघात होवू नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल बसविले आहेत. परंतु शहरात अनेक ठिकाणी वाहनचालक सिग्नलचे नियम बिनधास्तपणे तोडत आहेत. पामबीच रोडवर सिग्नल सुरू असतानाही वाहने वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सारसोळे, आगरी कोळी भवन चौक, करावे, किल्ला जंक्शनजवळ अपघात झाले आहेत. परंतु यानंतरही सिग्नल तोडण्याचे प्रमाण कमी होत नाही. शहरात सिग्नल तोडल्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असते. २००८ पासून पोलिसांनी तब्बल १ लाख २६ हजार ८४९ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. रोज किमान ६० ते ८० जणांवर सिग्नल तोडल्याची कारवाई केली जात आहे. परंतु यानंतरही वाहन चालकांमध्ये शिस्त येत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पनवेल परिसरामध्ये सिग्नल यंत्रणाच खराब झाली आहे. अनेक ठिकाणचे सिग्नल बंद आहेत. काही ठिकाणी सिग्नलमुळेच वाहतूक कोंडी होवू लागली होती. यामुळे सिग्नल फक्त शोभेची बाहुली बनले आहेत. नवी मुंबई, पनवेल दोन्ही परिसरात वाहन चालकांच्या बेशिस्तपणाला काही प्रमाणात वाहतूक पोलीसही जबाबदार आहेत.
पोलीस सिग्नलवर न थांबला सिग्नलच्या पुढे दबा धरून बसतात. सिग्नल तोडल्यानंतर कारवाई केली जाते. परंतु पोलीस जर सिग्नलवर थांबले तर वाहन चालकांमध्ये सिग्नल तोडण्याचे धाडसच होणार नाही. यामुळे वाहन चालकांनी नियम पाळले पाहिजेतच परंतु पोलिसांनीही फक्त कारवाईचा विचार न करता शिस्त लावण्याचा प्रयत्न करावा. सकाळी, सायंकाळी सिग्नलवर पोलीस दिसावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. वाहन चालकांनी स्वयंशिस्त लावून घेतली पाहिजे. सिग्नलवर वाहने थांबविलीच पाहिजेत. नागरिकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याची सवय लागली पाहिजे. नियम तोडून कारवाईची वेळ येवू देवू नये.
- अरविंद साळवे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक
चालकांची मनमानी : पनवेलमधील बसस्टँड, गार्डन हॉटेल, खांदा वसाहत परिसरातील सिग्नल सुरू असले तरी चालकांकडून त्यांचे पालन केले जात नाही.
वर्षकारवाई
२००८९७५९
२००९१४६७०
२०१०१५८०४
२०११७५९३
२०१२२४४७२
२०१३३१५६६
२०१४२२९८५