Join us  

'मी लोकसभेत जाणार, मग पवारसाहेब एकटे राज्यसभेत कसे?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 4:05 PM

वंचितांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जाऊन त्यांना सत्ता मिळणार नाही, वंचितांना सत्ता हवी असल्यास त्यांन माझ्यासोबत यावे, असे म्हणत आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे.

मुंबई - रिपब्लीकन पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यासाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा रिपल्बीकन पक्षाला सोडण्याचंही ते म्हणाले आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची युती होईल, असा विश्वास व्यक्त करत मी मुख्यमंत्र्यांकडे दक्षिण मध्य मुंबईतील जागेबाबत बोललो आहे, आता उद्धव ठाकरेंशीही बोलणार असल्याचे आठवले यांनी म्हटले. 

आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू झाली आहे. त्यासाठी जागांसंदर्भात वाटाघाटी आणि योग्य उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. याबाबत, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवली. तसेच भाजपा-शिवसेना युती व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही आठवलेंनी सांगितलं.

वंचितांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जाऊन त्यांना सत्ता मिळणार नाही, वंचितांना सत्ता हवी असल्यास त्यांन माझ्यासोबत यावे, असे म्हणत आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे. तर वंचित आघाडीच्या मतांचा फायदा महायुतीलाच होईल, असेही ते म्हणाले. तसेच मी लोकसभेत जाणार, मग पवारसाहेब एकटे राज्यसभेत कसे ? असे म्हणत शरद पवारांच्या लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भातील बातम्यामुळे आपणास आनंद झाल्याचे आठवले म्हणाले. दरम्यान, शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

टॅग्स :रामदास आठवलेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार