Join us
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेच्या लाटेचा सामना असा करा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 08:19 IST

१४ रुग्णालयांत ‘कोल्ड रूम’, आरोग्याची काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मंगळवारपर्यंत ही लाट कायम राहणार असल्याने मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 

अति उन्हामुळे उष्माघात टाळण्यासाठी लोकांनी सजग राहावे असे सांगताना मुंबई महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. महापालिकेची प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांत उष्माघात बाधितांवरील उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १४ रुग्णालयांत शीत कक्ष (कोल्ड रूम) रुग्णशय्या आणि औषधे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.

या काळात शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवले पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणत घाम येऊन शरीरातील पाण्याची पातळी घटते. त्यामुळे शरीरातील क्षार कमी होतात. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते.  परिणामी, चक्कर येणे, मळमळ होणे या आजारांचा सामना करावा लागतो. तसेच या काळात प्रखर उन्हामुळे त्वचेचे विकार जाणवू शकतात तसेच अंगावर,चेहऱ्यावर बारीक पुरळ उठणे सोबत त्वचा काली पडण्यासारख्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे पुरेसे प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. - डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय

उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास?

  1. पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून रुग्णाला आडवे झोपण्यास सांगावे.
  2. त्रास झालेल्या व्यक्तीला लगेच घरात, सावलीत आणावे. 
  3. थंड पाण्याच्या पट्ट्यांचा वापर करावा. सैल कपडे वापरावेत. 
  4. उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे. 
  5. उष्माघातासारखे वाटल्यास महापालिकेच्या अथवा जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा किंवा फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा. 

उष्णतेपासून बचाव  करण्यासाठी ‘हे करा  

  1. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
  2. दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरात रहावे
  3. पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला.
  4. पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.
टॅग्स :मुंबई