कुख्यात गणपथी सापडण्याची आशा
By Admin | Updated: June 17, 2015 03:14 IST2015-06-17T03:14:24+5:302015-06-17T03:14:24+5:30
कुख्यात नक्षलवादी गणपथी अद्याप देशातच असण्याची आशा दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) आहे. एटीएसने गेल्या महिन्यात

कुख्यात गणपथी सापडण्याची आशा
डिप्पी वांकाणी, मुंबई
कुख्यात नक्षलवादी गणपथी अद्याप देशातच असण्याची आशा दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) आहे. एटीएसने गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे येथे के. मुरलीधरन ऊर्फ अजिथ (६२) याला अटक केल्यानंतर त्याने चौकशीत मी गणपथीला भेटलो असल्याचे सांगितले होते. गणपथीवर तब्बल २.५२ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झालेले आहे.
मात्र तो कोणाला सहजी सापडेल ही आशा विरळ आहे. कारण गणपथीला जंगलात भेटण्यासाठी मला जो प्रवास करावा लागला ती एक मोठी परीक्षा दिल्यासारखेच होते, असे अजिथने चौकशीत सांगितले. तो म्हणाला की, अगदी वरिष्ठ नेत्यांवरही गणपथीचा विश्वास नाही. माझी त्याची भेट होण्यासाठी तब्बल चार दिवस लागले. त्यातील दोन दिवस मला घनदाट जंगलात डोळे बांधून पायी चालावे लागले. अजिथच्या म्हणण्यानुसार गणपथी त्याला जंगलाच्या मध्य भागात (ज्याला नक्षलवादी दंडकारण्य म्हणतात) भेटला. मुपल्ला लक्ष्मण राव (६५) ऊर्फ गणपथी हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओ-लेनिनवादी) सरचिटणीस असून, तो नऊ राज्यांतील पोलीस व राष्ट्रीय तपास यंत्रणेला (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी-एनआयए) हवा आहे. त्यासाठी गणपथीपर्यंत जाण्यासाठी उपयोगी पडेल, अशी कोणत्याही स्वरूपाची माहिती देणाऱ्याला महाराष्ट्र आणि छत्तीसगढ सरकारने प्रत्येकी एक-एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. आंध्र प्रदेशने २५ लाख व झारखंड सरकारनेही १२ लाख रुपये बक्षीस जाहीर केलेले आहे. एनआयएनेदेखील गणपथीबद्दल निश्चित माहिती देणाऱ्यास १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अजिथला त्याचा सहकारी इस्माईल चिरागपिल्ली याच्यासोबत ९ मे रोजी तळेगाव दाभाडे येथे अटक करण्यात आली होती. अजिथ हा भाकपा (माओवादी-लेनिनवादी) नक्षलबारीचा राष्ट्रीय सरचिटणीस होता. त्याने त्याच्या पक्षाचे गणपथीच्या कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियामध्ये (माओवादी) मे २०१४ मध्ये विलीनीकरण केले. विलीनीकरणानंतर अजिथला नक्षलवादी विचार युवकांमध्ये रुजविण्यासाठी मध्यवर्ती समितीचा सदस्य व थिंकटँकचा भाग बनविण्यात आले आहे. मी गणपथीला गेल्या वर्षभरात किमान तीन वेळा भेटलो, असे अजिथने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही त्याचे नेमके ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु प्रत्येक वेळी अजिथला गणपथीची भेट घेण्यासाठी चार चार दिवस लागल्याचे आम्हाला आढळले, असे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गणपथीची प्रत्यक्ष भेट व्हायच्या आधी अनेक टप्पे पार पाडावे लागतात. अजिथला एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यासाठी बस व रेल्वेने प्रवास करावा लागला. त्याचा वाटाड्या तेथून निघून गेला. दुसऱ्या वाटाड्याने अजिथला तेथून सोबत घेतले. हे दोन वाटाडे एकमेकांना ओळखत नाहीत व अजिथचा प्रवास कुठून सुरू झाला, हेही त्यांना माहिती नव्हते. प्रवासाचा शेवटचा टप्पा दोन दिवस निव्वळ पायी चालण्याचा असल्यामुळे दमवणारा होता, असे तो म्हणाल्याचे हा अधिकारी म्हणाला.