सफाई कामगारांना हक्काचे घर !
By Admin | Updated: June 17, 2015 03:03 IST2015-06-17T03:03:28+5:302015-06-17T03:03:28+5:30
राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांमधील सफाई कामगारांचा अनेक वर्षांचा लढा अखेर यशस्वी ठरला आहे. कित्येक वर्षांपासून शासन दरबारी

सफाई कामगारांना हक्काचे घर !
आनंदाची बातमी : २६९ चौरस फुटांची घरे
मुंबई : राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांमधील सफाई कामगारांचा अनेक वर्षांचा लढा अखेर यशस्वी ठरला आहे. कित्येक वर्षांपासून शासन दरबारी धूळखात पडलेल्या सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न सुटला आहे. सेवेची २५ वर्षे पूर्ण झालेल्या सफाई कामगारांना, त्याचप्रमाणे सेवा २५ वर्षांहून
कमी असेल तर सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना मोफत घरे देण्यात येणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत या कामगारांना २६९ चौ. फुटांची घरे देण्यात येतील. मुंबई शहरातील व राज्यातील सफाई कर्मचारी, त्यांच्या संघटना त्यांना सध्याच्या सेवा निवासस्थानांच्या जागेवरच मोफत सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे वारंवार मागण्या होत होत्या. या मागण्यांचा विचार करून सेवानिवृत्त सफाई कामगारांना अथवा सेवेत मृत्यू झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना सध्याच्या सेवा निवासस्थानाच्या ठिकाणी मालकी हक्काने मोफत सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सफाई कामगारांना २८ हजार ८०० घरे देण्यासाठी आश्रय योजना मुंबई पालिकेने आखली होती. मात्र जागेअभावी साडेसहा हजार घरांचीच व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता. मात्र आता या सफाई कामगारांना घरे मिळणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (प्रतिनिधी)