मुंबई : कोल्हापूर येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे शेअर्स देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपप्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील प्रकरणात कागल न्यायालयात सी समरी रिपोर्ट दाखल केल्याची माहिती सरकारी वकिलांनी बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने मुश्रीफ यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी दखल केलेली याचिका निकाली काढली.शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांनी मार्च २०२३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी न्यायालयात आणखी एक अर्ज केला. न्यायालयाने त्यांना वेळोवेळी अटकेपासून संरक्षण दिले.अखेरीस बुधवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी मुश्रीफ यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात कोल्हापूर पोलिसांनी कागल कनिष्ठ न्यायालयात सी समरी रिपोर्ट दाखल केल्याची माहिती न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाला दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर न्यायालयाने मुश्रीफ यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली.कोल्हापूर येथे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुश्रीफ यांनी २०१२ मध्ये बैठका आणि वृत्तपत्रांमधून आवाहन करून अनेकांकडून भाग भांडवल म्हणून १० हजार रुपये घेतले. तसेच त्या मोबदल्यात संबंधित व्यक्तींना प्रत्येक महिन्याला पाच किलो साखर नाममात्र दराने मिळण्यासह अन्य आर्थिक लाभ मिळतील, अशी प्रलोभने दाखविली. मात्र, या रकमेच्या बदल्यात कोणालाही भागधारक केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. मुश्रीफ यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मंत्री हसन मुश्रीफांना दिलासा, घोरपडे कारखानाप्रकरणी सी समरी रिपोर्ट दाखल झाल्याने याचिका निकाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:47 IST