Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेच्या मुंब्रा ते दिवा स्थानकांदरम्यान सोमवारी ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाविरोधात नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अशातच तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. यासोबत ट्रान्स हार्बर मार्गावरही याचा परिणाम झाला असून तिथली वाहतूकही विस्कळीत झाली आहे. यामुळे केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. सकाळच्या वेळेतच हा सगळा प्रकार घडल्याने लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला असून त्यामुळे कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या तांत्रिक बिघाडामुळे वाशी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गिका ठप्प पडली आहे. त्यामुळे जुईनगरपासून पुढे लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. गर्दीच्या वेळेतच रेल्वे सेवा अचानक ठप्प झाल्यामुळे हार्बर मार्गावरील स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे निघालेल्या काही गाड्या बेलापूर आणि सीवूड्स स्थानकांदरम्यान थांबवण्यात आल्या आहे. या विस्कळीततेचा परिणाम केवळ हार्बर मार्गासह ट्रान्स-हार्बर मार्गावरही झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उतरुन रेल्वे ट्रॅकवरुन चालण्यास सुरुवात केली आहे.
या बिघाडानंतर रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. "किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा काही काळासाठी विस्कळीत झाल्या होत्या. आता सकाळी ०८:४७ वाजता या सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. गैरसोयीबद्दल क्षमस्व," असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सीएसएमटीकडून कसाऱ्याकडे जाणाऱ्या आणि कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये मोठा अपघात झाला. वेगात असलेल्या लोकलमधील १३ प्रवासी खाली पडले. यातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर, रेल्वे प्रशासनाने नवीन गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.