गुरू नानक यांनी समानता, विश्वबंधुत्वाची शिकवण दिली - राज्यपाल कोश्यारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:29 IST2019-11-13T00:29:15+5:302019-11-13T00:29:18+5:30
गुरू नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मुंबई शीख संगततर्फे आयोजित प्रकाशपर्व सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या.

गुरू नानक यांनी समानता, विश्वबंधुत्वाची शिकवण दिली - राज्यपाल कोश्यारी
मुंबई : शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मुंबई शीख संगततर्फे आयोजित प्रकाशपर्व सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या. वडाळा येथील भक्ती पार्कमधील दिवाण चंद राम शरण कंपाउंड येथे मंगळवारी झालेल्या सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना, राज्यपालांनी गुरुनानक यांच्या समानता व विश्वबंधुत्वाच्या शिकवणीचे स्मरण दिले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विशेष तयार केलेल्या सुवर्ण व रजत मुद्रांचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाला चरणजीत सिंह सापरा, श्री गुरुसिंग सभेचे अध्यक्ष रघुबीरसिंग गिल, महासचिव मनमोहन सिंग, विश्वस्त हरिंदर सिंग, तसेच हजारो भाविक उपस्थित होते.
शेतात पिकलेल्या धान्याचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी गुरुनानक यांना पाठविले असता, त्यांनी प्रत्येक जिवात परमात्मा जाणून सर्व पाखरांना धान्य मुक्तपणे खाऊ घातले होते. या प्रसंगाची आठवण देताना, शीख धर्मातली ‘लंगर’ या प्रथेमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्मा पाहण्याचा विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
>गुरुनानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त धनपोद्दार गुरुद्वार येथे भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले.