ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित
By Admin | Updated: March 29, 2015 01:15 IST2015-03-29T01:15:04+5:302015-03-29T01:15:04+5:30
ज्या ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट व सप्टेंबर २०१५ मध्ये संपत आहे अशा ५ हजार ९७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली

ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित
मुंबई : ज्या ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट व सप्टेंबर २०१५ मध्ये संपत आहे अशा ५ हजार ९७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून मे ते जुलै २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २ हजार १३८ ग्राम पंचायतींच्या निवडणुका मात्र पूर्वी घोषित केल्याप्रमाणे २२ एप्रिल २०१५ रोजीच होतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी दिली.
राज्यातील अनेक ग्राम पंचायतींची निवडणूक चार ते पाच महिने आधीच घेण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला होता. त्यावर बहुसंख्य आमदारांनी नाराजी व्यक्त करत मुदतपूर्व निवडणुकांना विरोध दर्शविला होता. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या मागणीची दखल घेत मुदतीपूर्वी निवडणूक घेऊ नये, अशी विनंती आयोगाला केली होती. याबाबत सहारिया यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत नाशिक येथे कुंभमेळा असल्यामुळे निवडणुकीसाठी पुरेसे पोलीसबळ उपलब्ध होऊ शकणार नाही. तसेच केंद्राकडून राज्याला मिळणारे अर्धसैनिक दलदेखील मिळणार नाही. त्यामुळे त्या कालावधीत निवडणूक घेऊ नये, अशी विनंती पोलिसांकडून आयोगाकडे करण्यात आली होती. म्हणून मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा निर्णय झाला होता; परंतु, आॅगस्ट ते सप्टेंबरमधील निवडणूक आताच घेऊ नये, अशी मागणी आमदारांनी केली होती. (विशेष प्रतिनिधी)
२२ एप्रिल रोजी एकूण ८ हजार १०८ ग्राम पंचायतींची निवडणूक आधी होणार होती. मात्र, आता आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणार असलेल्या ५ हजार ९७० ग्राम पंचायतींची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे २२ एप्रिलला २ हजार १३८ ग्राम पंचायतींचीच निवडणूक होईल.