गोविंदा पथकांची ‘गांधीगिरी’

By Admin | Updated: August 24, 2015 02:14 IST2015-08-24T02:14:38+5:302015-08-24T02:14:38+5:30

दहीहंडी उत्सवावरून दिवसेंदिवस वाढणाऱ्या संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी गोविंदा पथके आणि आयोजक धडपडताना दिसत आहेत. मात्र गेल्या आठवड्यात बड्या आयोजकांच्या

Govinda squad's 'Gandhigiri' | गोविंदा पथकांची ‘गांधीगिरी’

गोविंदा पथकांची ‘गांधीगिरी’

स्नेहा मोरे, मुंबई
दहीहंडी उत्सवावरून दिवसेंदिवस वाढणाऱ्या संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी गोविंदा पथके आणि आयोजक धडपडताना दिसत आहेत. मात्र गेल्या आठवड्यात बड्या आयोजकांच्या बॅक आऊटनंतर आता थेट गोविंदा पथकांनीच राज्य शासनाविरोधात गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे. जोगेश्वरीच्या जय जवान पथकानंतर शहर-उपनगरांतील सर्वच गोविंदा पथकांनी पुढे येऊन स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा निर्धार केला आहे.
उपनगरचा राजा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या ‘जय जवान’ या गोविंदा पथकाने शनिवारी जोगेश्वरी स्थानकाच्या परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविली. या स्वाक्षरी मोहिमेला जोगेश्वरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
डोंबिवली येथील साई एकवीरा नवयुग गोविंदा पथक आणि ठाणे गोविंदा पथक समन्वय समितीच्या वतीने ठाणे, दिवा, डोंबिवली परिसरात स्वाक्षरी मोहीम घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह जगभरात कीर्ती मिळविणाऱ्या दहीहंडी उत्सवावर बंदीची वेळ येणे लज्जास्पद आहे. या पार्श्वभूमीवर दहीहंडी बंद झाली तर त्याचा परिणाम गणेशोत्सव आणि नवरात्रीवर होईल, त्यामुळे आम्ही उत्सव बंद होऊ देणार नाही. आता नाही तर कधीच नाही, दहीहंडी इतिहासजमा होऊ देऊ नका, अशी साद गोविंदा पथकांनी मुंबईकरांचा कल जाणून घ्यायचे ठरविले आहे.
विविध ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या स्वाक्षरी मोहिमेच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सास्कृंतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना सादर करण्यात येणार आहेत. गांधीगिरीच्या मार्गाने दहीहंडी उत्सवाचा संभ्रम दूर न झाल्यास गोविंदा पथकांनी रस्त्यांवर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राज्य शासनाला दिला आहे. त्यामुळे उत्सवासाठी मुंबईकरांचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे, असे म्हणत मुंबईकरांनाही स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

गोकुळाष्टमीपूर्वी सर्व गोविंदा पथकांना एकत्रित बोलावून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम चोर गोविंदा करतात. मुंबईतील उमरखाडी मंडळ गेली कित्येक वर्षे ही परंपरा जपत आहे. यावेळी ठिकठिकाणचे स्थानिक प्रतिनिधी सराव
शिबिरांचे आयोजन करतात. त्या ठिकाणी वेगवेगळी पथके येऊन सलामी घेत आपल्या सरावाचे सादरीकरण करतात.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्याला नारळ अर्पण केल्यानंतर गल्लोगल्ली नारळ फोडण्यासाठी लागणाऱ्या पैजा हे उमरखाडीच्या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
नारळी पौर्णिमेला शहरातील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित केले जाते. एकमेकांशी नारळ फोडून मैत्री केली जाते. सर्व पथकांतील गोविंदा मिळून एकत्रितरीत्या हंडी फोडली जाते. सर्व गोविंदा पथके सवंगड्यांसारखी एकत्र येऊन हंडी फोडण्याची रंगीत तालीम करतात.
चोर या नावाबाबत स्पष्टीकरण करताना दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर म्हणाले, की दहीहंडीच्या सरावाच्या वेळी कोणतेही पथक खरी तयारी सहसा दाखवत नाही. म्हणूनच चोर शब्दाचा वापर केल्याची हकिकत आहे.

Web Title: Govinda squad's 'Gandhigiri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.