सरकार आखतेय बिल्डरधार्जिणे धोरण
By Admin | Updated: May 19, 2015 02:02 IST2015-05-19T02:02:13+5:302015-05-19T02:02:13+5:30
वादग्रस्त विकास आराखड्यानंतर आता राज्यातील फडणवीस सरकारने गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून बिल्डरांना खूश करण्याचा प्रयत्न करीत आहे.

सरकार आखतेय बिल्डरधार्जिणे धोरण
मुंबई : वादग्रस्त विकास आराखड्यानंतर आता राज्यातील फडणवीस सरकारने गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून बिल्डरांना खूश करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमदार आणि निवडक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या गृहनिर्माण धोरणाचा आराखडा सामान्य मुंबईकरांच्या हिताला बाधा आणणारा आहे. भाजपाच्या दिल्लीतील बड्या नेत्यांच्या इशाऱ्यावर यशदाने सादर केलेला गृहनिर्माण आराखडा बदलून नवा बिल्डरधार्जिणा आराखडा
सादर करण्यात आल्याची टीका
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
नव्या आराखड्यात ८०० चौरसफुटाच्या रहिवासी सदनिका व ५०० चौफ़ुटाच्या व्यावसायिक गाळ्यांना रेंट अॅक्टमधून वगळण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच पुनर्विकासासाठी रहिवाशांच्या मान्यतेची अट ७० टक्क्यावरून ५० टक्क्यांवर आणण्याचा घाट घालण्यात आला आहे. आधीच बिल्डरांकडून रहिवाशांची फसवणूक होत असताना मान्यतेची अट श्थििल केल्यास बड्या बिल्डरांचे फावणार आहे.
काँग्रेसचा मोर्चा
केंद्रातील मोदी सरकारचा एक वर्षातील कारभार निराशाजनक आणि मतदारांचा अपेक्षाभंग करणारा असल्याचा आरोप करीत २६ मे रोजी मोदी सरकारविरोधात मुंबई काँग्रेसने मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. संरक्षण, काळा पैसा आणि महागाईच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या मोदी सरकारची याच मुद्द्यावरील कामगिरी अत्यंत निराशाजनक
राहिली आहे.
केवळ फेब्रुवारी महिन्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत तब्बल ६५० वेळा सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. काळा पैसा तर आलाच नाही, उलट महागाई वाढतच आहे. तरीही मागील पंतप्रधानांपेक्षा आपला कारभार उत्तम असल्याचा ढोल नरेंद्र मोदी पिटत आहेत. मोदींच्या या राजकारणाला शह देण्यासाठी २६ मे रोजी मोदी सरकारविरोधात मोर्चा व २१ मे रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या उल्लेखनीय कामगिरीला उजाळा देण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संजय निरुपम यांनी दिली.
(प्रतिनिधी)
च्२१ मे रोजी राजीव गांधी यांच्या पुण्यतीथीचे औचित्य साधून मुंबईत वॉर्डनिहाय पदयात्रा काढण्यात येणार आहेत. राजीव गांधींनी आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत भारतात संगणक क्रांतीसारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
च्वॉर्डनिहाय पदयात्रांच्या माध्यमातून कॉंग्रेस कार्यकर्ते एकीकडे राजीव गांधींची कामगिरी जनतेसमोर आणतानाच मोदींच्या खोट्या प्रचाराला उघडे पाडतील.