दरवाढी विरोधात न्यायालयात जाणार
By Admin | Updated: June 19, 2015 00:16 IST2015-06-19T00:16:30+5:302015-06-19T00:16:30+5:30
सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर ठाणेकरांवर करवाढ तर लादलीच. पण सभागृहातील गोंधळाचा फायदा घेऊन महत्त्वाचे विषय मंजूर करून घेतले.

दरवाढी विरोधात न्यायालयात जाणार
ठाणे : सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर ठाणेकरांवर करवाढ तर लादलीच. पण सभागृहातील गोंधळाचा फायदा घेऊन महत्त्वाचे विषय मंजूर करून घेतले. त्या विरोधात विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच महापौर केवळ आपल्या फायद्याचे निर्णय घेत असल्याचा आरोप करून गोंधळात घेतलेल्या निर्णयाबाबत महापालिका आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
बुधवारच्या महासभेत पाणीदरात वाढ करण्यात आली आहे. पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी अशा प्रकारची वाढ करणे अपरिहार्य असल्याचे कारण देऊन सत्ताधारी शिवसेनेने या करवाढीला मान्यता दिली. मात्र, सभागृहातील गोंधळात हे विषय मान्य झाले असून आतापर्यंतच्या सर्वच विषयांवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. एखादा विषय मंजुरीसाठी आल्यानंतर त्यावर सभागृहात चर्चा होणे गरजेचे असताना सरसकट अशा विषयांना मंजूरी देण्यात येते. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी करवाढ आणि बेकायदेशीरपणे घेतलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.