वर्सोवा विधानसभेची उमेदवारी कोळी समाजाला द्या, मच्छिमारांची महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 7, 2024 18:09 IST2024-10-07T18:08:06+5:302024-10-07T18:09:06+5:30

मुंबई फक्त कोळ्यांची ही फक्त घोषणा होते प्रत्यक्षात सरकारमध्ये कोळी समजावर अन्याय होतं असल्याची भावना कोळी समाजामध्ये आहे. 

Give Versova assembly candidacy to Koli community, fishermen demand to senior leaders of Mahavikas Aghadi | वर्सोवा विधानसभेची उमेदवारी कोळी समाजाला द्या, मच्छिमारांची महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी

वर्सोवा विधानसभेची उमेदवारी कोळी समाजाला द्या, मच्छिमारांची महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी

मुंबई-कोळी बांधव हे मुंबईचे आद्य नागरिक भूमिपुत्र आहेत. आज पर्यंत कोळी बांधवांना मुंबईत कोणत्याही पक्षाने लोकप्रतिनिधीत्व दिलेले नाही. कोळी समाजाचे अनेक प्रश्न त्यामुळे प्रलंबित आहेत. मुंबई फक्त कोळ्यांची ही फक्त घोषणा होते प्रत्यक्षात सरकारमध्ये कोळी समजावर अन्याय होतं असल्याची भावना कोळी समाजामध्ये आहे. 

डिझेलचे वाढते भाव, समुद्रातील प्रदूषण, मत्स्य उत्पादनाची घटणारी टक्केवारी. बेरोजगार कोळी तरुण पिढी इत्यादी भयावह परिस्थिती कोळी समाजात असून सुद्धा, कोळी समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडणारा हक्काचा कोळी प्रतिनिधी विधानसभेत असावा अशी भावना समाजाची आहे. त्यामुळे वर्सोवा विधानसभेची उमेदवारी कोळी समाजाला द्या
अशी मागणी मच्छिमारांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.

  वर्सोवा मतदार संघात येणारे वेसावा हे कोळी बांधवांचे मासेमारीसाठी प्रख्यात बंदर आहे.येथे तीनशे- चारशे मासेमारी बोटी असून कोट्यावधीची उलाढाल होत असते.वेसव्यातील कोळी लोक भूमिपूत्र असून, मोठ्या प्रमाणात कोळी समाजाची वस्ती वर्सोवा मतदार संघात असून त्यांना आपला स्वतःचा लोकप्रतिनिधी 
असावा अशी मागणी अनेक वर्षा पासून येथील कोळी समाजाकडून केली जात आहे.

  वेसाव्यातील स्थानिक मच्छिमार नेते, व राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष प्रदिप टपके यांनी आपल्याला वर्सोवा विधानसभा विभागातून पक्षातर्फे उमेदवारी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. मच्छिमार समाजाला शरद पवार न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र फिशरमन काँग्रेसच्या मागणी नुसार ऑल इंडिया फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष व मच्छिमार नेते रामदास संधे यांनी काल कोळी समाजाच्या वतीने वर्सोवा विधानसभेसाठी पक्षांतर्गत उमेदवारी अर्ज भरला.यावेळी ऑल इंडिया फिशरमन काँग्रेसने वर्सोव्यातून रामदास संधे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.

 देशाच्या स्वातंत्र लढ्यात  कोळी समाजाचे मोठे योगदान खुप आहे. ब्रिटिशां विरोधात लढणारे ११४ स्वातंत्रसैनिक वेसावा गावातील होते. तरीसुद्धा येथील कोळी समाजाला लोकप्रतिनिधीत्व मिळत नाही ही खेदाची गोष्ट असल्याचे वेसावा कोळी नाखवा मंडळाचे अध्यक्ष जयराज चंदी यांनी सांगितले.
 

Web Title: Give Versova assembly candidacy to Koli community, fishermen demand to senior leaders of Mahavikas Aghadi