कन्या शाळेची इमारत धोकादायक

By Admin | Updated: May 31, 2015 22:30 IST2015-05-31T22:30:01+5:302015-05-31T22:30:01+5:30

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मालकीची नेरळ येथील कन्या शाळा कधीही कोसळू शकते अशा स्थितीत आहे. शंभर वर्षे जुन्या शाळेची दुरु स्ती

The girl school building is dangerous | कन्या शाळेची इमारत धोकादायक

कन्या शाळेची इमारत धोकादायक

कर्जत : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मालकीची नेरळ येथील कन्या शाळा कधीही कोसळू शकते अशा स्थितीत आहे. शंभर वर्षे जुन्या शाळेची दुरु स्ती जिल्हा परिषद आणि आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीकडून केली जात नाही. सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे यावर्षी तेथे कन्या शाळेचे वर्ग भरतील अशी परिस्थिती नाही. धोकादायक कन्या शाळेची इमारत तोडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे.
नेरळ चावडी कार्यालयाच्या मागे असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कन्या शाळेची इमारत १९१५ मध्ये बांधण्यात आली आहे. कौलारू असलेली ही इमारत चार खोल्यांची असून लांबलचक व्हरांडा आहे. येथील फरशी खोल गेली आहे. त्यामुळे आजूबाजूला उंच भाग तयार झाला असून शाळेच्या इमारतीबाहेर असलेला रस्ता किमान तीन फूट उंच आहे, त्यामुळे पावसाळ्यात शाळेत येणाऱ्या मुलींना वर्गात येताना साठलेल्या पाण्यामुळे उड्या मारत यावे लागते.पावसाची संततधार सुरु असेल तर वर्गात पाणी येत असते अशा वेळी शाळेचे कामकाज करणे तेथील शिक्षकांना शक्य होत नाही. दरवर्षी शाळेच्या सभोवताली पाणी साठत असल्याने शंभर वर्षे जुन्या इमारतीचा पाया आणि भिंती कायम ओलसर असतात. परिणामी त्या सर्व भिंती आता धोकादायक झाल्या आहेत.
सर्व परिस्थिती शाळा व्यवस्थापन समितीने गेली पाच वर्षे जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समितीला सातत्याने लेखी स्वरूपात कळविली आहे. मात्र शाळेच्या नादुरुस्त इमारतीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे शंभर वर्षे जुन्या शाळेची शंभरी भरली आहे. २०० हून अधिक मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्यांची सुरक्षा यावर्षी अधिक संकटात आली आहे.
जिल्ह्यात फार तुरळक ठिकाणी कौलारु छप्पर असलेल्या शाळेच्या इमारती राहिल्या आहेत. नेरळमधील कन्याशाळेची इमारत ही अशीच शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात मुलींना वर्गात बसविणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे असल्याचे मत शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुभाष नाईक यांनी व्यक्त केले आहे.
दुसरीकडे शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आम्ही फक्त चर्चा करायची का? असा सवाल समितीच्या अध्यक्षा राजश्री सावंत यांनी केला आहे. सर्व बैठकीचा अहवाल समितीच्या सचिव आणि शाळेच्या मुख्याध्यापिका उषा नेटके यांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयास दिले आहेत. तरी देखील प्रशासन या शाळेच्या इमारती कडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाच्या या ढिम्म भूमिकेमुळे ग्रामस्थ तसेच शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The girl school building is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.