येत्या २२ ऑगस्ट २०२५ पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वात लोकप्रिय चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने चिंचपोकळीचा चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची तारीख ठरली आहे. गणेशमंडळाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका व्हिडीओसह शेअर करत आगमन सोहळ्याची तारीख जाहीर केली.
चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळ्यात १७ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील परेल येथील कलागंधा आर्ट्स येथून सुरुवात होणार आहे. मुंबईतील १०५ वर्षे जुन्या गणेशमंडळाच्या मूर्तीची पहिली झलक पाहण्यासाठी लोक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना १९२० मध्ये करण्यात आली.
चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा पाहण्यासाठी मुंबईतील परळ परिसरात दरवर्षी हजारो भाविक जमतात. वाहतुकीच्या समस्या टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या काही दिवसआधीच गणेशमूर्तीला मंडळात आणले जाते. महत्त्वाचे म्हणजे, १७ ऑगस्ट २०२५ पासून भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल. भाविकांना सकाळी ६ ते दुपारी २ आणि संध्याकाळी ४ ते रात्री १० पर्यंत दर्शन घेता येईल.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. भाजपचे आमदार आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी हेमंत रासने यांनी पावसाळी अधिवेशनात राज्य विधानसभेत ही मागणी मांडली होती. त्यांनी १८९३ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा गौरव करत, गणेशोत्सवाला 'राज्य उत्सव' घोषित करून त्याचा अधिक व्यापक प्रचार व प्रसार करण्याची विनंती केली होती.