गाढी नदीवरील संरक्षक रेलिंग गायब
By Admin | Updated: July 16, 2015 22:54 IST2015-07-16T22:54:12+5:302015-07-16T22:54:12+5:30
पनवेल कोळीवाड्याजवळ गाढी नदीवरील पुलाचे लोखंडी रेलिंग तुटल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाहनचालकांकडून वर्तवण्यात येत आहे.

गाढी नदीवरील संरक्षक रेलिंग गायब
पनवेल : पनवेल कोळीवाड्याजवळ गाढी नदीवरील पुलाचे लोखंडी रेलिंग तुटल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाहनचालकांकडून वर्तवण्यात येत आहे. या पुलावरून उरणकडे जाणाऱ्या वाहनांची कायम वर्दळ असते. वाहतूक वाढल्यामुळे पुलाची दयनीय अवस्था झाली आहे.
उरण नाका व करंजाडे गावाला जोडणाऱ्या या पुलावर फेरीवाल्यांची संख्याही वाढत आहे. फेरीवाल्यांमुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडते. चार ते पाच वर्षांपूर्वी या नदीवर एकच पूल होता. मात्र वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे येथे दुसरा पूल बांधण्यात आला. जुना पूल हा देखील वाहतुकीसाठी खुला आहे व नवीन पुलावरून देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. या दोन्ही पुलांचे कठडे व त्याला असलेली लोखंडी रेलिंग तुटलेले आहेत. त्यामुळे येथे गतवर्षी एक अपघात झाला होता. लोखंडी रेलिंग तुटल्यामुळे चारचाकी गाडी पाण्यात पडली होती. महिन्यापूर्वी दुचाकीस्वार देखील असाच नदीत पडला होता. सुदैवाने किरकोळ दुखापत झाली होती. अशा प्रकारचे छोटे-मोठे अपघात येथे नेहमी घडतच असतात. मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
प्रशासनाचे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम खात्याने दोन्ही पुलांचे कठडे व त्याला असलेले लोखंडी रेलिंग दुरु स्त करून द्यावेत, अथवा पनवेल नगरपालिकेच्या माध्यमातून
दुरु स्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. या पुलावर मोठ्या प्रमाणावर अवजड तसेच लहान वाहने आणि शाळकरी वाहने ये-जा करीत असतात, मात्र प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.