भावी सैनिकांची गैरसोयींशी लढाई

By Admin | Updated: January 21, 2015 01:59 IST2015-01-21T01:59:22+5:302015-01-21T01:59:22+5:30

सैन्यदलात जाऊन देशाची सेवा करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या तरूणांना मात्र शासन स्तरावरील उदासिनतेमुळे भरती प्रक्रियेतील गैरसोयींचा फटका बसत आहे.

Future fighters with inadvertent soldiers | भावी सैनिकांची गैरसोयींशी लढाई

भावी सैनिकांची गैरसोयींशी लढाई

प्रशांत शेडगे ल्ल पनवेल
सैन्यदलात जाऊन देशाची सेवा करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या तरूणांना मात्र शासन स्तरावरील उदासिनतेमुळे भरती प्रक्रियेतील गैरसोयींचा फटका बसत आहे. पनवेलमध्ये सुरू असलेल्या सैन्यभरतीलासाठी आलेल्या हजारो तरुणांना नियोजनाअभावी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच रात्र काढावी लागली. त्यामुळे या भावी सैनिकांमध्ये शासकीय यंत्रणेबाबत संतापाची लाट आहे.
सोमवारपासून कर्नाळा अकादमीत मुंबई, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांकरीता सैन्य भरती सुरू झाली. मात्र निवासाची व्यवस्थाच नसल्याने कर्नाळा अकादमीसमोरच्या रस्त्यावर बसून रात्र काढण्याची वेळ या उमेदवारांवर आली आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्याकरीता जमिनीला अंथरूण आणि अकाशाला पांघरूण समजून हजारो उमेदवार रस्त्यावरच रात्र काढत असून भरती प्रक्रि येत सामील होत आहेत. रात्रीची बोचरी थंडी, डासांचा उच्छाद आणि रस्त्यावरील वाहनांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदुषणाशी भावी सैनिकांना दोन हात करावे लागत आहेत. सैन्यदलातील ८०० जागांकरिता पाच दिवसांत या ठिकाणी जवळपास २५००० हजार उमेदवार येणे अपेक्षीत आहेत. कागदपत्रांची छाननी, धावणे, शाररिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखीपरिक्षा या प्रक्रि येतून सैन्यांची भरती केली जाते. पहाटे चार वाजता भरतीला सुरूवात होत असल्याने उमेदवारांना त्या आगोदर दोन तास हजर राहावे लागते. ज्यांचे पनवेलमध्ये नातेवाईक नाहीत. तसेच हॉटेल किंवा लॉजवर मुक्काम करण्याइतपत या उमेदवारांची परिस्थीती नसल्याने शेकडो तरूणांना अकादमीच्या समोरील रस्त्यावर झोपावे लागत आहे. कर्नाळा अकादमीसमोरील रस्त्यावर अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण मोठे आहे.

सरकारला कधी जाग येणार?
काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या पोलीस भरतीच्या वेळी उघडयावर झोपल्यामुळे उमेदवारांचा मृत्यू झाला होता. उन्हाचा कडाका आणि पाण्याची टंचाई यामुळे या ठिकाणी आलेल्या उमेदवारांच्या कामगिरीवरही परिणाम झाला. ही वस्तुस्थिती प्रसारमाध्यमांनी उजेडात आणल्यानंतर या ठिकाणी सोयीसुविधा पुरवण्यात आला. मात्र आता सैन्यभरतीच्यावेळी मोठ्या प्रमाणात गैरसोयी असल्याने सरकारला कधी जाग येणार असा सवाल होत आहे.

उमेदवारांसाठी शौचायल, रूग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र इतक्या मोठया संख्येने आलेल्या तरूणांची राहण्याची सोय करता येणे कठीण आह, असे तहसिलदार पवन चांडक यांनी सांगितले.

थंडीच्या दिवसात उघडयावर झोपल्याने शरिरातील तापमान कमी होऊन हायपोथरमीया होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डास चावल्याने मलेरिया किंवा डेग्यूंची लागण होऊ शकतो, असे डॉ. मनिष बेहरे यांनी सांगितले.

Web Title: Future fighters with inadvertent soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.