अकरावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात?
By Admin | Updated: July 14, 2014 23:40 IST2014-07-14T23:40:34+5:302014-07-14T23:40:34+5:30
पालघर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना अकरावी व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास असमर्थता दर्शविली आहे

अकरावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात?
हितेन नाईक, पालघर
महाराष्ट्र शासनाकडून अतिरिक्त तुकड्यांना मान्यता दिल्याच्या निर्णयाची कॉपी विद्यापीठाकडून पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाला मिळाली नसल्याने त्यांनी पालघर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना अकरावी व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास असमर्थता दर्शविली आहे. आपल्याला प्रवेश मिळेल या आशेने दररोज शेकडो विद्यार्थी आपल्या पालकांसह दांडेकर कॉलेजचे उंबरठे झिजवत असल्याचे केविलवाणे चित्र सर्वत्र दिसत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र अंधारात सापडले आहे.
या वर्षी १० वी, १२ वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास बहुतांशी महाविद्यालयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच महाविद्यालयांनी अकरावी व प्रथम वर्षासाठी अतिरिक्त तुकड्यांची मागणी केली असताना शासनाकडून महाविद्यालयांना मान्यता दिल्याचा दावा केला जात असला तरी मान्यतेच्या निर्णयाचे पत्र देण्यास विद्यापीठ हतबल ठरल्याने अनेक महाविद्यालयांपुढील पेच वाढले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत तीन तुकड्यांतर्गत ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून प्रवेश अर्ज भरलेल्या ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळू शकलेला नाही. प्रथम वर्ष विज्ञान शाखेसाठीही महाविद्यालयाने १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून सुमारे ३०० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. प्रथम वर्ष कला शाखेत ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला असून उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. प्रथम वर्ष वाणिज्य व कला शाखेतील ३६० विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक २४० विद्यार्थ्यांना अनुदानित तर १२० विद्यार्थ्यांना विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश मिळालेला आहे, तर विज्ञान शाखेतील १२० विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश मिळालेला आहे.
प्रथम वर्षासाठीच्या प्रवेशापेक्षा अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. १२ वी च्या कलाशाखेत ४२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असला तरी २०० हून अधिक विद्यार्थी प्रवेशासाठी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवकांच्या कार्यालयाचे खेटे मारत आहेत. अकरावी वाणिज्य शाखेसाठीही अनुदानित तुकड्यांतर्गत ३०० तर विनाअनुदानांतर्गत ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असला तरी ४०० हून अधिक विद्यार्थी वंचित आहेत, तर विज्ञान शाखेत अनुदानित २४० व विनाअनुदानित २४० अशा ४८० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला असला तरी ६०० हून अधिक विद्यार्थी अजून प्रतीक्षा करीत आहेत.
सरकारी पातळीवरून तुकड्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचा दावा केला जात असून मान्यतेचे पत्र विद्यापीठाकडे पाठविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शासनाने याबाबत तत्काळ निर्णय घेत विद्यापीठाला कळवावे, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. परंतु प्रत्येकी एका तुकडीस शासनाने मान्यता दिली तरी उर्वरित विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहणार आहे.