Join us  

मनसेला सोडचिठ्ठी देणा-या 6 नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 11:22 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांचा लवकच फैसला होण्याची शक्यता आहे.

मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांचा लवकच फैसला होण्याची शक्यता आहे. कोकण आयुक्त बुधवारी (10 जानेवारी) किंवा गुरुवारी (11 जानेवारी) या संदर्भात निकाल देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेकडून या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटांची मागणी केली आहे. मात्र,  गेल्या तीन महिन्यांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यावर कोकण आयुक्त बैठक बोलवून निर्णय देण्याच्या तयारीत आहेत.  

मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक  

हर्षला मोरे

अश्विनी माटेकर

अर्चना भालेराव

दिलीप लांडे 

दत्ताराम नरवणकर

परमेश्वर कदम  

शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करू देऊ नका - मनसे

मुंबई महानगर पालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण भवनात जाऊन आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांची भेट घेतली होती. मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी मनसेच्या नेत्यांनी केली आहे. अशा आशयाचे निवदेन त्यांनी कोकण आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांना दिले होते.  

सत्तेसाठी रस्सीखेच : शिवसेनेकडे ८४ अधिक तीन अपक्ष व आता मनसेचे सहा असे ९४ नगरसेवक आहेत. भाजपाकडे ८२ अधिक दोन अपक्ष असे ८४ नगरसेवक आहेत. त्यात भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होईल. या प्रभागात भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाचे संख्याबळ ८५ होईल. काँग्रेसचे दहा नगरसेवक फोडल्यास भाजपाकडे ९५ म्हणजे शिवसेनेपेक्षा एक नगरसेवक अधिक असेल. 

टॅग्स :शिवसेनामनसेमुंबई महानगरपालिका