मस्ती केलीच तर उग्र आंदोलन
By Admin | Updated: August 26, 2015 01:01 IST2015-08-26T01:01:50+5:302015-08-26T01:01:50+5:30
कृती समितीचा इशारा : शिरोली टोलनाक्यावर आज कार्यकर्ते जमणार

मस्ती केलीच तर उग्र आंदोलन
कोल्हापूर : राज्य सरकार टोल रद्द करण्याबाबत आग्रही असून, दोन जबाबदार मंत्र्यांनी प्रकल्पाचा खर्च भागविण्याची तयारी केली आहे. अंतिम निर्णय होण्यास विलंब होत असला तरी ‘आयआरबी’ने टोलवसुलीची मस्ती करू नये. जर का टोलवसुली करण्याचा प्रयत्न केलाच तर रस्त्यावर उतरून पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा खणखणीत इशारा मंगळवारी सायंकाळी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला. दरम्यान, राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी यांनी एकत्र बसून रस्त्यांचे मूल्यांकन निश्चित करावे आणि राज्य सरकारने आता विलंब न करता तातडीने टोल रद्द केल्याची अधिसूचना काढावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांच्या आवाहनानंतर आयआरबी कंपनीने टोलवसुलीला (पान ९ वर) पंधरा दिवसांसाठी तात्पुरती स्थगिती दिली होती. ही मुदत आज, बुधवारी संपत असून, टोलवसुलीची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने काय भूमिका घ्यावी, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी येथील विठ्ठलमंदिरात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत हा इशारा देण्यात आला. आज, बुधवारी स्थगितीची मुदत संपत असल्याने आयआरबी कंपनी टोलवसुली करण्याची शक्यता गृहीत धरून त्याला विरोध करण्यासाठी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजल्यापासून दिवसभर शिरोली टोलनाक्यावर जमावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. दिवसभर त्या ठिकाणी थांबून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांना टोल द्यायचा नाही, असे आवाहन करण्याचे ठरले. वाहनधारकांनी जर टोल दिलाच तर वाहनाची काच फुटली जाईल, अशी भीती घालायची, असेही ठरले. त्यामुळे जर टोलवसुलीची आगळीक केलीच तर मात्र पुन्हा एकदा
टोलवरून धुमशान सुरू होण्याची चिन्हे आहेत.
सरकार सकारात्मक आहे. ते कृती समितीच्या पाठीशी आहे; त्यामुळे ‘आयआरबी’ने थोडे सबुरीने घ्यावे. सरकारवर विश्वास आहे, म्हणून आम्ही शांत बसलो याचा अर्थ आम्ही गप्प बसणाऱ्यांतील नाही. जर मस्ती केलीच तर ती उतरविण्यात आम्ही कमी पडणार नाही, असा इशारा निमंत्रक निवासराव साळोखे यांनी यावेळी बोलताना दिला.
नुसते गप्प बसलो तर काही होणार नाही. मैदानात उतरल्याशिवाय टोल रद्द केल्याचा निर्णय होणार नाही. म्हणूनच सरकारनेही आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी आपणाला रस्त्यावर उतरावेच लागेल, असे चंद्रकांत यादव म्हणाले. जर आयआरबी कंपनी मंत्र्यांच्या विनंतीला मान देणार नसेल आणि त्यांची विनंती डावलून टोल वसूल करणार असेल तर आपणही गप्प का बसावे? असा सवाल सतीशचंद्र कांबळे यांनी उपस्थित केला. टोल सुरू केला तर जनता गप्प बसणार नाही, हे आयआरबीने समजून घ्यावे, असे आवाहन पंडितराव सडोलीकर यांनी केले.
यावेळी संभाजीराव जगदाळे, अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, नामदेव गावडे, बाबा पार्टे, लालासाहेब गायकवाड, अशोकराव साळोखे, भगवान काटे, हिंदुराव शेळके, अशोक पोवार, दीपाताई पाटील, वैशाली महाडिक, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)