पुष्पकनगरमधील भूखंडांच्या विक्रीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: June 17, 2016 00:54 IST2016-06-17T00:54:27+5:302016-06-17T00:54:27+5:30
विमानतळबाधितांच्या पुनर्वसनासाठी पुष्पकनगर येथे २२.५ टक्के भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. या भूखंडांचे वाटपपत्र देण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. सिडकोने आता

पुष्पकनगरमधील भूखंडांच्या विक्रीचा मार्ग मोकळा
नवी मुंबई : विमानतळबाधितांच्या पुनर्वसनासाठी पुष्पकनगर येथे २२.५ टक्के भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. या भूखंडांचे वाटपपत्र देण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. सिडकोने आता या भूखंडांच्या त्रिपक्षीय करारनाम्याची प्रक्रियाही सुरू केल्याने भूधारकांना आपल्या भूखंडाची बाजारभावाने विक्री करता येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सिडकोने दहा गावातील ६७२ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्याबदल्यात येथील प्रकल्पग्रस्तांना नियोजित पुष्पकनगरमध्ये २२.५ टक्के विकसित जमीन देण्यात आली आहे. आठ महिन्यांपूर्वी या भूखंडांची संगणकीय सोडत काढण्यात आली होती. त्यानुसार लाभधारकांना भूखंडांचे वाटपपत्रे देवून जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देण्याची कार्यवाही यापूर्वीच पनवेल येथील मेट्रो सेंटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी त्रिस्तरीय कराराची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही आपल्या भूखंडांची विक्री करता येत नव्हती. परंतु आता सिडकोनेच त्रिपक्षीय करारनाम्याची प्रक्रिया सुरू केल्याने प्रकल्पग्रस्तांना आपल्या भूखंडांची विक्री करता येणार आहे. विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या भूखंडांची विक्री न करता स्वत:च त्याचा विकास करावा, या दृष्टीने सिडकोचे प्रयत्न आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांचे प्रबोधन करण्यासाठी सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी विविध स्तरावर प्रयत्न केले होते. त्याचप्रमाणे भूखंड विकायचेच असतील तर घाई करू नका, काही वर्षे प्रतीक्षा केल्यास या भूखंडांना कोटींचे भाव येतील, असेही सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांना वारंवार सांगण्यात येत आहे. त्यानंतरही ज्यांना आपल्या भूखंडांची विक्री करायची असेल, त्यांची गैरसोय होवू नये, या दृष्टीने सिडकोने त्रिपक्षीय कराराची प्रक्रिया सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
वाटपपत्रे घेण्यास उदासीनता
२२.५ टक्के भूखंड वाटपाची सोडत काढून आठ महिन्यांचा काळ उलटला. परंतु या भूखंडांचा भाडेकरार करण्याबाबत प्रकल्पग्रस्तांत फारसा उत्साह नसल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून आतापर्यंत फक्त सात प्रकल्पग्रस्तांनी सिडकोबरोबर आपल्या भूखंडांचा भाडेकरार केला आहे. आता त्रिपक्षीय कराराची प्रक्रिया सुरू केल्याने आपल्या भूखंडांचा भाडेकरार करण्यासाठी प्रकल्पग्रस्त नक्कीच पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुष्पकनगरमध्ये सध्या जमिनीच्या भरावाचे काम सुरू आहे. साधारण पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर संबंधित लाभधारकांना त्यांच्या भूखंडांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.