चौपदरीकरणात दुजाभाव
By Admin | Updated: June 3, 2015 22:48 IST2015-06-03T22:48:39+5:302015-06-03T22:48:39+5:30
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी परिसरातील राज्यमार्ग रस्ते चौपदरीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता
चौपदरीकरणात दुजाभाव
नेरळ : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी परिसरातील राज्यमार्ग रस्ते चौपदरीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कल्याण-कर्जत या दरम्यानचा ८० टक्के रस्ता चौपदरी झाला आहे, मात्र ठेकेदार कंपनीकडून भूसंपादन प्रक्रिया करण्यात आली नसल्याने संपूर्ण राज्यमार्ग चौपदरी झाला नाही. तशीच स्थिती कर्जत -खोपोली राज्यमार्ग रस्त्याची झाली असून तेथे अर्ध्याहून अधिक रस्ता चौपदरी न करता डांबरीकरण पूर्ण करून जनतेची फसवणूक ठेकेदार आणि एमएमआरडीए प्रशासन यांनी केली आहे. प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरण कामासाठी तब्बल १०० कोटी खर्च केले आहेत.
खोपोली-कर्जत-नेरळ-कल्याण-भिवंडी-डहाणू या राज्यमार्ग ३५ चे चौपदरीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून या रस्त्याच्या चौपदरी कामावर खर्च होणार होता. रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि दुतर्फा गटार, ज्या ठिकाणी मोठ्या लोकवस्तीचे गाव असेल तेथे सर्व्हिस रस्ता असे नियोजन होते. मात्र कर्जत आणि खालापूर तालुक्यातील रस्त्याची अवस्था लक्षात घेता अनेक ठिकाणी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले नाही.
गावे रस्त्यात असलेल्या ठरावीक ठिकाणी रस्त्याचे चौपदरीकरण करताना तेथे भूसंपादन न करता तेथील दुभाजक ठेकेदाराने गायब केले आहेत. नेरळ गावाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे चौपदरीकरण हे सिमेंट काँक्रीटकरण केले जाणार होते. तेथे दीड किलोमीटरच्या टप्प्यात कुठेही सिमेंटचा रस्ता तर बनविला नाही,परंतु चौपदरी रस्ता देखील अनेक ठिकाणी तयार झालेला नाही. नेरळ धरण परिसरात पादचारी पूल बांधण्यात येणार होता,तो देखील न बांधता जनतेची फसवणूक केली आहे. तशीच स्थिती डिकसल येथील असून तेथे रस्त्यासाठी जमीन घेतली मात्र कोणालाही त्याचा मोबदला दिला नाही. (वार्ताहर)