चार'चौघां'च्या साक्षीने शुभलग्न सावधान!

By Admin | Updated: June 6, 2015 22:56 IST2015-06-06T22:56:34+5:302015-06-06T22:56:34+5:30

अशोक सराफ यांच्यासारखा हुकमाचा एक्का हाती असल्यावर अर्धाअधिक डाव जिंकल्यातच जमा असतो. रंगभूमीवर हा ‘सराफी’ सफाईदारपणा थेट अनुभवणे हीसुद्धा औत्सुक्याची बाब ठरते.

The four-thougee's eyes full of caution! | चार'चौघां'च्या साक्षीने शुभलग्न सावधान!

चार'चौघां'च्या साक्षीने शुभलग्न सावधान!

नाटक : लगीनघाई

अशोक सराफ यांच्यासारखा हुकमाचा एक्का हाती असल्यावर अर्धाअधिक डाव जिंकल्यातच जमा असतो. रंगभूमीवर हा ‘सराफी’ सफाईदारपणा थेट अनुभवणे हीसुद्धा औत्सुक्याची बाब ठरते. अशा वेळी नाट्यकृतीच्या इतर बाजूंवर त्यांचा प्रभाव असणे, हे तर ओघाने आलेच ! त्यातच ‘लग्न’ या कळीच्या मुद्द्यावर नाटक बेतले असेल, तर त्यातली गंमत अधिकच वाढते. ‘लगीनघाई’ हे नाटकही याला अपवाद ठरत नाही. या नाटकातल्या लग्नाचे चौघडे मध्यमवयीन पातळीवर वाजतात आणि यातल्या चार'चौघां'च्या साक्षीने शुभलग्न सावधान म्हणत अक्षतांची रंगतदार पखरण करतात.
विधुर, विधवा किंवा घटस्फोटित व्यक्तींनी पुनर्विवाह करावा की करू नये, हा तसा व्यक्तिनिहाय प्रश्न असला तरी तो आजही सामाजिक डूब असलेला एक विषय आहे. ‘लगीनघाई’ या नाटकाचा हाच पाया आहे. पण तो सादर करताना त्याला हलक्याफुलक्या विनोदाची झालर लावल्याने हा प्रयोग त्याची हसतखेळत मांडणी करतो. यात नाटकातले विधुर राजीव परांजपे आणि घटस्फोटित मालती प्रधान यांचे एकमेकांवर प्रेम आहे. त्यांना लग्नही करायचे आहे. राजीव यांना अनिकेत हा तरुण मुलगा आहे आणि तो बाहेरगावी शिकायला आहे. त्यामुळे राजीव आणि मालती यांच्या भेटीगाठी त्यांच्या घरी ठरलेल्या आहेत. एकदा सरप्राइज द्यायचे या हेतूने अनिकेत अचानक घरी येतो. अनिकेतला काही तरी महत्त्वाचे वडिलांशी शेअर करायचे आहे. याउलट राजीव यांना त्यांच्या लग्नाबद्दल अनिकेतशी बोलायचे आहे. लवकर लग्न करण्यासाठी मालती राजीवच्या मागे लागलेली आहे; पण अनिकेतजवळ हा विषय मांडायचा कसा, असा प्रश्न राजीव यांना पडलेला आहे. मात्र त्याआधीच अनिकेत, त्याची मैत्रीण पूनमवर प्रेम असल्याचे जाहीर करतो. पूनमची त्यांच्याशी ओळखही करून देतो. पण या सगळ्या प्रकारामुळे राजीव यांच्यापुढे मोठाच पेच उभा राहतो. एक आदर्श वडील म्हणून अनिकेतला सामोरे जायचे की स्वत:च्या प्रेमाला तिलांजली द्यायची, असा गुंता राजीव यांच्या मनात वाढत जातो. याचदरम्यान पूनमच्या वडिलांमुळे अनिकेत व तिच्यात ब्रेकअप होतो आणि राजीव यांचे मन पुन्हा दोलायमान स्थितीत भ्रमण करू लागते. अनिकेतला आपल्या लग्नाबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मालती राजीवना सांगते. पण राजीव ते धैर्य एकवटू शकत नाहीत. मग मालतीच यातून जो काही मार्ग काढते, त्या मार्गावर या संसाराचा हा रथ पुढे ओढला जातो.
अद्वैत दादरकर याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले हे नाटक तसे वास्तवाला धरून आहे. अनेकांच्या बाबतीत ही गोष्ट म्हणजे स्वत:ची कहाणी ठरू शकते आणि त्याला विस्तृत असे सामाजिक परिमाणही आहे. पण यातल्या गांभीर्याला थोडेसे बाजूला सारून अद्वैतने एक मनोरंजनात्मक प्रयोग मंचित करण्याला प्राधान्य दिले आहे. यातल्या राजीव आणि मालती यांचे प्रौढ वय समजण्यासारखे असले, तरी नाटकातल्या पात्रांच्या निवडीनुसार त्या दोघांच्या वयातले अंतर हे बरेच जास्त वाटते. मात्र एकंदर यातले नाट्य अद्वैतने चांगले फुलवले आहे. शशांक तेरे यांनी राजीव यांचे घर नेटके उभे केले आहे आणि शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून त्यात मस्त रंग भरले आहेत.
अशोक सराफ यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यासाठी, या नाटकातला राजीव साकारणे म्हणजे फार काही आहे अशातला भाग नाही आणि त्यांनी त्यांच्या खास स्टाईलने ही भूमिका पेश केली आहे. संहितेच्या दृष्टीने त्यांच्या भूमिकेत तसे नावीन्य नसले, तरी त्या व्यक्तिरेखेत अशोक सराफ आहेत हीच गोष्ट अधिक महत्त्वाची ठरते. मात्र नाटकात त्यांच्याकडून 'आॅ' अशा येणाऱ्या उद्गाराची मात्रा जरा जास्त झाली आहे. गंमत म्हणून ते ठीक आहे; पण अनेकदा गंभीर प्रसंगातही त्याची पुनरावृत्ती होत असल्याने त्या त्या वेळच्या मूडच्या गांभीर्याला ते मारक ठरते. यादृष्टीने अनुभवाचे बोल त्यांनी या नाटकाच्या तरुण दिग्दर्शकाच्या कानावर घालणे आवश्यक होते.
नाटकात अदिती देशपांडेने रंगवलेली मालती फर्मास आहे. तिचा रंगभूमीवरचा प्रसन्न वावर, संवादफेक, देहबोली उत्तम आहे. तिच्या तोंडी एकसारखे राजीव यांना नावाने साद घालण्याचे प्रमाण मात्र अंमळ जास्त झाले आहे. पण अदितीची रंगभूमीवरची लगबग अनुभवण्याजोगी आहे. मोलकरणीचे सोंगही तिने मस्त वठवले आहे.
अशोक सराफ यांच्यासमोर ताकदीने उभे राहण्याची अफलातून कामगिरी अनिकेतच्या भूमिकेत असलेल्या ओंकार राऊत याने या नाटकात पार पाडली आहे. ही भूमिका साकारताना तो कुठेही कमी पडलेला नाही की कुठेही भांबावलेला नाही. अभिनयातली त्याची उत्स्फूर्तता वाखाणण्यासारखी आहे. पूनमच्या भूमिकेत नियती घाटेने चांगले रंग भरले आहेत.

तिसरी घंटा
राज चिंचणकर

Web Title: The four-thougee's eyes full of caution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.