चार दिवस वीज पुरवठा खंडित
By Admin | Updated: June 12, 2014 01:24 IST2014-06-12T01:24:16+5:302014-06-12T01:24:16+5:30
बोर्लीपंचतनमध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा सतत लपंडाव सुरुच आहे. गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा संपूर्णत: बंदच असल्याने उकाड्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

चार दिवस वीज पुरवठा खंडित
बोर्लीपंचतन : बोर्लीपंचतनमध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा सतत लपंडाव सुरुच आहे. गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा संपूर्णत: बंदच असल्याने उकाड्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. वीज नसल्याने व्यावसायिकांचेही बरेच नुकसान झाले आहे.
गेली दोन वर्षे अभियंत्याशिवाय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यात अपयश येत आहे. बोर्लीपंचतन येथील महावितरणच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. बोर्लीपंचतन कार्यालयाकडे व विजेच्या समस्येकडे कोण लक्ष देणार, असाच प्रश्न नागरिकांना पडला आहे.
यंदा पावसाचे आगमन लांबले असून उष्म्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे उकाड्याने सर्वच हैराण झाले आहेत. यातच गेले चार दिवस बोर्लीपंचतन, दिवेआगर व इतर आसपासच्या गावांतील वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिक त्रस्त आहेत.
बोर्लीपंचतन कार्यालयात गेली दोन वर्षे कनिष्ठ अभियंतापद रिक्त आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नाही. येथील प्रभारी कार्यभार श्रीवर्धन शहर कनिष्ठ अभियंता विरेंद्र मानकर यांचेकडे आहे परंतु त्यांनाही तेथील कामकाजाकडे वेळ देणे शक्य होत नसल्याने विजेची समस्या जैसे थेच आहे. (वार्ताहर)