Join us  

लॉकडाऊनची वीजबिले माफ करा; महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 4:41 AM

असहकार आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहेत. नागरिक घरात असल्याने सर्वांची रोजीरोटी बंद आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे यासाठी भांडुप पश्चिम वीजमंडळाच्या कार्यालयाबाहेर महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीजग्राहक संघटना यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. राज्य सरकारने तत्काळ वीजबिले माफ करावी, अन्यथा राज्यभर वीजबिले न भरण्याची मोहीम हाती घेऊन असहकार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.वीज कंपन्यांकडून नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिले आली आहेत. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत, अशांना ही बिले भरणे कठीण झाली आहेत. वीज कंपन्यांनी वीजबिले भरण्यासाठी तगादा लावल्याने आत्महत्या झाल्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे सरकारने ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांची वीजबिले तत्काळ माफ करावीत या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती प्रभाकर नारकर यांनी दिली.राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीजग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत. या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीजग्राहक संघटना यांनी धरणे आंदोलन जाहीर केले होते. े.यापूर्वी १३ जुलै रोजी या मागणीसाठी राज्यस्तरीय वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये, काही ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये, अनेक गावांमध्ये व मुंबईसह अनेक महापालिका क्षेत्रात झाले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने घरगुती वीजग्राहकांना वीजबिलांमध्ये २० ते ३० टक्के सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तथापि ही तोकडी सवलत वीजग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही, असे होगाडे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :वीज