पहिल्या नगररचनाकाराच्या दृष्टिकोनाचा विसर
By Admin | Updated: June 19, 2015 01:32 IST2015-06-19T01:32:11+5:302015-06-19T01:32:11+5:30
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळख निर्माण झालेल्या नवी मुंबईच्या नियोजनाची पायाभरणी चार्ल्स कोरिया यांनी केली. भविष्याचा वेध घेऊन

पहिल्या नगररचनाकाराच्या दृष्टिकोनाचा विसर
नामदेव मोरे , नवी मुंबई
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळख निर्माण झालेल्या नवी मुंबईच्या नियोजनाची पायाभरणी चार्ल्स कोरिया यांनी केली. भविष्याचा वेध घेऊन त्यांनी बैठ्या चाळी, छोट्या इमारती बांधल्या. परंतु त्यांच्या दृष्टिकोनाचा सर्वांना विसर पडला आहे. बिल्डरधार्जिण्या टॉवर संस्कृतीचा उदय झाला असून शहराच्या भवितव्यापेक्षा आर्थिक फायद्याचा विचार सुरू झाला आहे.
नवी मुंबईच्या विकासाची पायाभरणी करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नगररचनाकार चार्ल्स कोरिया यांचा समावेश होतो. अल्प उत्पन्न गटांपासून अतिश्रीमंत व्यक्तींना या शहरात राहण्यास आवडेल अशा पद्धतीने त्यांनी शहराची रचना केली. कला क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना या शहरात वास्तव्य करणे आवडावे यासाठी त्यांनी आर्टिस्ट व्हिलेजची रचना केली. अल्प उत्पन्न गटासाठी छोटी घरे बांधली. भविष्यात रहिवाशांना स्वत:च्या घरांचा विस्तार करता यावा यासाठी जागा शिल्लक ठेवली. यामुळेच नेरूळ सेक्टर १६, १८ परिसरात रहिवाशांना वाढीव बांधकाम करून घरांचा आकार वाढविता आला. माथाडी व इतर अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी चाळी बांधल्या. छोट्या इमारती व चाळी बांधल्यामुळे शहरात हवा खेळती राहील. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. बांधकाम धोकादायक झाल्यानंतर त्यांचा पुनर्विकास रहिवाशांना करता येईल, असा विचार तेव्हा करण्यात आला होता.
मात्र त्यांच्या दृष्टिकोनाचा आता शहरवासीयांना विसर पडला आहे. परवडणारी घरे बांधली जात नाहीत. गगनाला भिडणारे टॉवर उभे केले जात आहेत. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागेवरही मोठे टॉवर उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बिल्डरांनी अनेक रहिवाशांचे संमतीपत्रही मिळविले आहे. बैठी घरे, छोट्या इमारती ही संकल्पनाच कालबाह्य झाली आहे. याचा गंभीर परिणाम शहरवासीयांना भोगावा लागणार आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता शहरातील इमारती २५ ते ३० वर्षांच्या आतमध्येच धोकादायक होत आहेत. आताच १० ते १५ व त्याहीपेक्षा जास्त मजल्यांचे टॉवर उभारून भविष्यात ते मोडकळीस आल्यानंतर करायचे काय याचा सर्वांना विसर पडत आहे.
नवी मुंबई गरिबांची राहिली नाही
शहरातील ज्येष्ठ वास्तुविशारद पी. एस. नाडकर्णी यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, चार्ल्स कोरिया यांनी तीन प्रकारच्या घरांची संकल्पना राबविली. अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांसाठीही घरांचे नियोजन केले. परंतु आता बिल्डरधार्जिणे धोरण सुरू झाले आहे. नवी मुुंबईत गरिबांसाठी घरे बांधली जात नाहीत. शहर गरिबांचे राहिले नसल्याची खंत वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुद्धीचा चुकीचा वापर
चार्ल्स कोरिया हे भारतातील आधुनिक वास्तुकलेचा चेहरा म्हणून ओळखले जात होते, भविष्यातही त्यांची ओळख कायम राहील. परंतु आता काही वास्तुरचनाकार अनधिकृत इमारतींचे आराखडे तयार करून देण्यासाठी बुद्धी खर्च करू लागले आहेत.
आर्थिक हितापुढे हजारो नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. शहराच्या भवितव्याचा विसर पडत आहे. अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालणाऱ्या वास्तुविशारदांवर कारवाई करून नियोजनबद्ध शहर अशी शहराची ओळख कायम ठेवणे हीच कोरिया यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.