‘सागर कवच’ला पाच तडे!
By Admin | Updated: November 25, 2015 03:13 IST2015-11-25T03:13:26+5:302015-11-25T03:13:26+5:30
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांचा स्मृतिदिन दोन दिवसांवर आलेला असताना, राज्यातील समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत

‘सागर कवच’ला पाच तडे!
डिप्पी वांकाणी, मुंबई
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांचा स्मृतिदिन दोन दिवसांवर आलेला असताना, राज्यातील समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत असलेल्या यंत्रणांना ‘आॅपरेशन सागर कवच’ने आठवडाभरापूर्वी काळजीत टाकले आहे. सागरी मार्गाने येण्याच्या पाच महत्त्वाच्या ठिकाणी (लॅण्डिंग पॉइंटस्) सुरक्षा यंत्रणांच्या ‘दहशतवाद्यांचा’ गट पोलिसाचे कडे भेदण्यात यशस्वी ठरला. या पाच ठिकाणांमध्ये मुंबईतील फेरी वार्फ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), मुंबई पोर्ट ट्रस्ट, ससून डॉक आणि नवी मुंबईतील लॅण्डिंग पॉइंटचा समावेश होता.
१८ व १९ नोव्हेंबर रोजी हा द्वैवार्षिक सराव घेण्यात आला. हा सराव संपूर्ण रायगड किनारपट्टीवर घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. २६/११ चा हल्ला करण्यासाठी दहशतवादी ज्या किनाऱ्यावरून मुंबईत आले, ती किनाऱ्यावरील ठिकाणे किती सुरक्षित आहेत, याचा आढावा या सुरक्षेची ज्यांना गरज आहे, त्यातील भारतीय नौदल, भारतीय किनारा रक्षक, पोलीस, सागरी पोलीस, कस्टम्स्, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, गुप्तचर संस्था, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि जेएनपीटी दर सहा महिन्यांनी अशा सरावाद्वारे घेत असतात. या सरावादरम्यान अधिकाऱ्यांची विभागणी दोन गटांत करण्यात आली होती. त्यातील एक गट हा ‘दहशतवादी’ बनला होता, तर दुसऱ्या गटाने पोलिसांची भूमिका पार पाडली. या ‘दहशतवाद्यां’कडे खऱ्याखुऱ्या दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे किनाऱ्यावरून मुंबईत येण्यासाठी वापरली होती तशी, परंतु प्रत्यक्षात खोटी-खोटी स्फोटके, मशिनगन्स आणि इतर उपकरणे, साधने होती. या पोलीस तुकडीकडे हे दहशतवादी गट किनाऱ्यावर पोहोचणार नाहीत, अशी जबाबदारी देण्यात आली होती.
हा सराव/अभ्यास स्थानिक २५ ठिकाणी करण्यात आला. त्यापैकी २० ठिकाणी आमचे पोलीस या दहशतवाद्यांना अडविण्यात यशस्वी ठरले, परंतु पाच ठिकाणी पोलीस या दहशतवाद्यांना अडवू शकले नाहीत. हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना एखाद्या ठिकाणीही प्रवेश मिळणे पुरेसे ठरते. त्यामुळे आम्ही ही बाब खूपच गांभीर्याने घेतली आहे, असे या सरावावर लक्ष ठेवून असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याने सांगितले. हा सराव २६/११ हल्ल्यांचा स्मृतिदिन आणि नुकताच पॅरीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचा होता, असे त्याने सांगितले. अशा सरावांचे स्वरूप व्यापक असते. अशा स्वरूपाच्या सरावात दहशतवाद्यांच्या गटाला शब्दश: एकही यश मिळायला नको, असे अधिकाऱ्यांना सांगितलेले असते, परंतु आम्ही मात्र येथे पाच ठिकाणी त्यांना अडवू शकलेलो नाही. आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि ही संख्या कशी कमी करता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्याने सांगितले.