Join us  

विचारधारेची लढाई दहापट अधिक तीव्रतेने लढू, राहुल गांधीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 12:27 PM

संघ आणि भाजपाविरोधातील लढाई ही विचारधारेची लढाई आहे. ही लढाई आता आम्ही आधीच्या पेक्षा दहा पट अधिक तीव्रतेने लढणार

मुंबई - संघ आणि भाजपाविरोधातील लढाई ही विचारधारेची लढाई आहे. ही लढाई आता आम्ही आधीच्या पेक्षा दहा पट अधिक तीव्रतेने लढणार आहोत, असा निर्धार  राहुल गांधी आज व्यक्त केला. गौरी लंकेश हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी आज राहुल गांधी मुंबईतील शिवडी न्यायालयात उपस्थित राहिले होते. तेव्हा त्यांनी संघ आणि भाजपाच्या विराचरधारेवर जोरदार टीका करताना या विचारसणीविरोधातील लढाई सुरू ठेवण्याचा पुनरुच्चार केला. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांमुळे दाखल मानहानीच्या खटल्यात जामीन मंजूर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी विचारधारेची लढाई तीव्रतेने लढणार असल्याचे सांगितले. ''ही विचारधारेची लढाई आहे, ही लढाई आम्ही गेल्या पाच वर्षांत जेवढ्या तीव्रतेने लढत होतो त्यापेक्षा दहापट अधिक शक्तीने लढणार आहोत. मी गरीब, शेतकरी, मजूर यांच्यासोबत आहे.'' दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याबाबतचे स्पष्टीकरण मी कालच राजीनाम्याममधून दिले आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत अधिक बोलणे टाळले.  

गौरी लंकेश हत्या प्रकरणी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी आज शिवडी येथील न्यायालयात उपस्थित राहिले. यावेळी आपण निर्दोष असल्याचे तसेच गौरी लंकेश हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक  संघावर केलेल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी न्यायलयासमोर सांगितले. त्यानंतर न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या हमीवर त्यांचा जामीन मंजूर केला. काँग्रेसचे मुंबईतील नेते एकनाथ गायकवाड यांनी राहुल गांधींसाठी जांमीन दिला. दरम्यान, राहुल गांधी आज मुंबईत येत असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर तसेच शिवडी येथील न्यायालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. तसेच राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत होती.  

टॅग्स :राहुल गांधीकाँग्रेसराष्ट्रीय स्वयंसेवक संघराजकारण