मैदान : उद्योगमंत्र्यांनी मारली बोईसरकरांना टांग
By Admin | Updated: August 11, 2015 23:44 IST2015-08-11T23:44:42+5:302015-08-11T23:44:42+5:30
बोईसर एमआयडीसीतील ओएस ४६/२ या प्लॉटची विक्री प्रक्रिया थांबवून त्वरित तो प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवण्यात यावा, या मागणीचा फैसला मंगळवारी करतो त्यासाठी समितीच्या शिष्टमंडळाला

मैदान : उद्योगमंत्र्यांनी मारली बोईसरकरांना टांग
- विशेष प्रतिनिधी, बोईसर
बोईसर एमआयडीसीतील ओएस ४६/२ या प्लॉटची विक्री प्रक्रिया थांबवून त्वरित तो प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवण्यात यावा, या मागणीचा फैसला मंगळवारी करतो त्यासाठी समितीच्या शिष्टमंडळाला मंत्रालयात बोलवून चर्चा करतो असे आश्वासन गोरेगाव येथील बैठकीत देणाऱ्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बोईसरकरांना मंगळवारी अक्षरश: टांग मारली.
काल पालकमंत्री विष्णू सवरा यांनी मैदानाला प्रत्यक्ष दिलेली भेट आणि समितीशी केलेली चर्चा व मंगळवारची मंत्रालयातील चर्चा निर्णायक ठरण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिलेले आश्वासन वांझोटेच ठरले. आपल्याला उद्योगमंत्र्यांचे अवताण कधी येते याची वाट संपूर्ण दिवस समितीने पाहिली परंतु उद्योगमंत्र्यांकडून ना काही सांगावा आला, ना चर्चा आज होणार की नाही. का ती पुढे ढकलली. याचीही काही सूचना समितीला प्राप्त झाली नाही म्हणायला स्थानिक आमदार विलास तरे बविआच्या काही कार्यकत्यांसह मंत्रालय परीसरात दिवसभर होते. तर समिती बोईसरातच होती. देसाई मंत्रालयात होते. त्यामुळे समितीच्या आशा पल्लवीत होत्या. परंतु साडेतीन चार नंतर ते मंत्रालयाबाहेर गेल्यामुळे ही बैठक होण्याच्या आशा साफ मावळल्या. तर दुसरीकडे या प्रकरणाबाबत वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. ज्या बोईसर मतदार संघातला हा प्रश्न आहे.
तिथले आमदार विलास तरे हे बविआचे आहेत. तर पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा हे भाजपचे आहेत. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडविला तर त्याचे श्रेय शिवसेनेला न मिळता तरे व सवरा यांना मिळेल. मग कशाला हा प्रश्न एवढ्या तत्परतेने सोडवायचा या प्रश्नी स्थानिक शिवसेनेने स्वतंत्रपणे ठाम अशी जाहिर भूमिका घेतलेली नाही.त्यामुळे हा प्रश्न सुटला तर त्याचे श्रेय सेनेला मिळणार नाही. या विचारातून उद्योगमंत्र्यांनी बोईसर वासियांना ही टांग मारल्याचे चर्चिले जात आहे. मैदान बचाव संघर्ष समितीने स्थानिक पदाधिकारी व पुढाऱ्यांची मदत घेऊन शासनदरबारी प्रचंड वेगाने हालचाली सुरू केल्या होत्या. यामुळे शनिवारी उद्योगमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सोमवारी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी या मैदानाची पाहणी केली होती.
पालकमंत्री चिंचणीच्या पी.एल. श्रॉफ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमास आले असता पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती व भाजपाचे नेते अशोक वडे यांनी मैदान बचाव संघर्ष समिती व अन्य पक्षीय नेत्यांबरोबर भेट घडवून चर्चा केली होती. सवरा यांनी मी आपल्यासोबत असून जनभावनेच्या विरोधात निर्णय न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सोमवारी चर्चा करून उद्या संध्याकाळपर्यंत आपणास ठोस निर्णय कळवितो, असे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिले होते. त्यामुळे सवरा व मुख्यमंत्री यांची भेट मंगळवारी रात्री अथवा मध्यरात्री होणार असल्याचीही चर्चा होती. पालघरचे खा. चिंतामण वनगा यांनीही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सदर प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता हा प्रश्न मुख्यमंत्री आणि सवरा यांना सोडवू द्यावा, अशा भूमिकेतून उद्योगमंत्री देसाई यांनी माघार नृत्य केल्याचे बोलले जात आहे.
बोईसरचे आमदार विलास तरे हे असून ते बविआचे आहेत, पालघरचे संपर्कमंत्री विष्णू सवरा असून ते भाजपचे आहेत. पालघरचे खासदार चिंतामण वनगा भाजपचे आहेत. जिल्ह्यातील सेनेचे एकमेव आमदार कृष्णा घोडा कालवश झाले आहेत.
अशा स्थितीत बोईसरच्या क्रीडांगणाचा प्रश्न आपण तातडीने सोडविला तर त्याचे श्रेय भाजप आणि बविआला मिळेल अशा संकुचित दृष्टीकोनातून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संघर्ष समितीला मंगळवारी वाऱ्यावर सोडले.
एवढ्या महत्वाच्या प्रश्नावर शिवसेना राहिली मौनीबाबा, सर्वपक्षिय संघर्ष समितीतही शिवसेनेचे अस्तित्व नगण्य.