Join us  

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती, डॉ. ओक यांचा लोकमतशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 4:40 AM

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांची ‘लोकमत’शी बातचित

अतुल कुलकर्णी मुंबई : रेमडेसिवीरबद्दल जागतिक मत काहीही असले, तरी हे औषध मुंबई आणि महाराष्ट्रातील रुग्णांना उपयोगी ठरत आहे. त्यामुळे ते बंद करून चालणार नाही. २६ ते २७ नोव्हेंबरनंतर मुंबईसह महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढेल, मात्र त्याचा विस्फोट होईल अशी परिस्थिती आज दिसत नाही, असे स्पष्ट मत सरकारने नेमलेल्या टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक यांनी व्यक्त केले.

लस निघेपर्यंत यावर उपाय तरी काय? असे विचारले असता डॉ. ओक म्हणाले, २६ ते २७ नोव्हेंबरच्या पुढे रुग्णांची संख्या वाढत जाईल, मात्र सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझर ही त्रिसूत्री तुम्हाला सदा सर्वकाळ अमलात आणावी लागेल. मात्र महाराष्ट्रासाठी पहिल्या इतकी ती भयंकर नसेल. महाराष्ट्रात दुसरी लाट येणार का? आल्यास ती किती तीव्र असेल?  यावर डॉ. ओक म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार केला तर रुग्णांची संख्या आटोक्यात असल्यासारखी दिसत आहे. आजाराचा प्रसार थांबलेला नसला तरी तो विस्फोटक आहे, असे म्हणण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. केरळसारख्या राज्याला सप्टेंबर ऑक्टोबरचा काळ खडतर गेला आहे. दिल्लीची अवस्था भयावह आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सतर्क राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

रेमडेसिवीर इंजेक्शन उपयुक्तचजागतिक पातळीवर रेमडेसिवीरबद्दल काही मत व्यक्त केले जात असले तरी आपल्या डॉक्टर्सना हे अत्यंत उपयुक्त औषध सापडलेले आहे. त्याचा योग्य वेळी केलेला प्रयोग अत्यवस्थ रुग्णांना वाचवण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे येत्या काळात औषधांचा साठा करून ठेवावा लागेल.  असेही डॉक्टर ओक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईडॉक्टर