वाड्यात शेतकरी संकटात!
By Admin | Updated: July 14, 2015 22:59 IST2015-07-14T22:59:47+5:302015-07-14T22:59:47+5:30
तालुक्यात यावर्षी पाऊस वेळेवर सुरू झाल्याने शेतकरी आनंदात होता. त्यांनी भातपेरण्या लवकरच उरकुन मशागतीच्या कामांना सुरूवात केली होती.

वाड्यात शेतकरी संकटात!
वाडा : तालुक्यात यावर्षी पाऊस वेळेवर सुरू झाल्याने शेतकरी आनंदात होता. त्यांनी भातपेरण्या लवकरच उरकुन मशागतीच्या कामांना सुरूवात केली होती. परंतु गेले कित्येक दिवस पाऊस पडतच नसल्याने रोपांची वाढ खुंटली असून ती पुर्णपणे करपु लागली आहेत. शेत जमीनीला भेग पडल्या आहेत. त्यामुळे शेतीची कामे पुर्णपणे ठप्प झाली असून भातशेतीचा हंगाम निघून चालल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भातशेती करण्यात येते. संपुर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या वाडा कोलम या जातीच्या भाताचे विक्रमी उत्पादन तालुक्यात घेतले जाते. यंदा बी-बियाणे व खते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने व पावसाची सुरूवात लवकर झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने रोपांची वाढ खुंटली असून ती करपु लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील १७६ गावे व २०० हुन अधिक पाड्यातील १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. त्या खालोखल २५० हेक्टर क्षेत्रात नागलीचे उत्पादन तर १६० हेक्टर क्षेत्रात गळीत धान्य घेतले जाते. गेल्या १४ वर्षापासून पाऊस उशीरा सुरू होतो. मात्र या वर्षी वेळेत सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मशागत करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मजुर वर्ग विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, नाशिक येथून आपण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी मजुरांचा समावेश असतो. (वार्ताहर)
वाड्यातील शेतकरी शेतामध्ये वाडा कोलम, गुजरात-११, दप्तरी, मसुरी, सुवर्णा, गुजरात - ४, रत्ना, जया, सोनम, पुनम, अशा विविध जातीच्या भात बियाणांचा वापर करण्यात येत आहे. मात्र पावसाचा लहरीपणा भातबियाणे व खतांच्या किमतीतही प्रचंड वाढ झाल्याने शेती न परवडणारी झाली असल्याची खंत नारे येथील शेतकरी भगवान गायकर यांनी व्यक्त केली.
ज्या किंमतीत खते व बियाणे वापरून उत्पादन खर्च केला जातो. तो उत्पादन केलेला माल विकुन होत नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काही गावातील शेतकऱ्यांनी आता रब्बी पिक घेण्यास सुरूवात केली आहे तर काही शेतकऱ्यांनी मजुरांअभावी पेर भाताला पसंती देवून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी रब्बी पिकांकडे वळु लागले आहेत.
दरम्यान पाऊस पडेल असे चिन्ह देखील दिसत नसल्याने शेतकरी पुर्णपणे संकटात सापडला असून भातशेती लागवडी घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत तो सापडला आहे. उशीरा पाऊस पडला तरी त्याचा भात शेतीला काही फायदा नाही. त्यामुळे उत्पन्न घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे म्हणून शेतकरी धोक्यात सापडण्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे.