Join us  

भाजपाच्या सोशल मीडिया रॅकेटचा पर्दाफाश करा; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 9:36 PM

मास्टर माइंडचा शोध घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

मुंबई,- अभिनेता सुशांतसिंग याने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्सने दिल्याने मुंबई पोलिसांचे चारित्र्य उजळून निघाले आहे. त्यांनी केलेली चौकशी प्रामाणिक व योग्य दिशेनेच होती.  त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करणारा भाजपा उघडा पडला आहे. हे षडयंत्र रचणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.सावंत म्हणाले की, मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी व सुशांतसिंग प्रकरणाचा बिहार निवडणुकीत वापर करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचे एक मोठे षडयंत्र रचण्यात आले होते. याचबरोबर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपाने रचले होते. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही या बदनामीच्या कटात महत्वाची भूमिका वठवली होती. तर रातोरात शेकडो फेक सोशल मीडिया अकाऊंट उघडून त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करण्यात आली. या सर्वांचे पितळ उघडे पडले आहे.गोदी मीडियानेही महाराष्ट्राला बदनाम करण्याचा अजेंडा चालवला. तपास यंत्राणांनीही खोटी माहिती लिक केली. कालपर्यंत सीबीआयचा हवाला देत ३०२ चा गुन्हा दाखल केला जाणार एवढ्या निखालस खोट्या,कपोलकल्पित बातम्या देण्यात आल्या. भाजपाचे नेते, त्यांचा आयटी सेल व गोदी मीडियाला हाताशी धरून पद्धतशीरपणे महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. विरोधी पक्षाच्या सरकारांची बदनामी करण्याची भाजपाची कार्यपद्धती  लोकशाहीसाठी घातक असून या प्रकरणाच्या मुळाशी जावून मुख्य सुत्रधार कोण, याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे सावंत म्हणाले.

टॅग्स :काँग्रेस