पार्ल्यात मध्यरात्रीनंतरही रंगला शिवकल्याण राजाचा प्रयोग
By Admin | Updated: August 24, 2014 22:57 IST2014-08-24T21:03:59+5:302014-08-24T22:57:42+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट घरांघरांत पोहोचवण्याचा मान शिवकल्याणराजा या शिवस्तुतीला जातो.

पार्ल्यात मध्यरात्रीनंतरही रंगला शिवकल्याण राजाचा प्रयोग
अंधेरी: छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट घरांघरांत पोहोचवण्याचा मान शिवकल्याणराजा या शिवस्तुतीला जातो. शिवकल्याण राजा या संगीत-शब्दांच्या कलाकृतीला आता तब्बल ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भावगंधर्व, पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर यांच्या या शिवस्तुतीच्या ४० वर्षांच्या प्रवासाचा रंजक अनुभव घेण्याची संधी पार्लेकरांना आली होती. या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असताना मध्यरात्र कधी उलटली हे देखील पार्लेकरांच्या ध्यानी आले नसावे...शिवकल्याणराजाच्या कार्यक्रमाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे हेच दिसून आले. विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यमंदिरात या नेटक्या सोहळ्याचे आयोजन सोहम प्रतिष्ठानचे विनय गोरे यांनी केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट वयाच्या ९३ व्या वर्षीही अत्यंत तडफेने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थितांसमोर मांडला. पुरंदरे शिवचरित्राचे विवेचन करत असताना हृदयनाथ मंगेशकरांनी या प्रयोगाच्या निर्मितीवेळचे अनेक किस्से सांगितले. मंगेशकरांचे संगीत आणि गायिका विभावरी जोशी-आपटे यांच्या मंजूळ आवाजाच्या साथीमुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या प्रयोगाची निर्मिती १९७४ साली सर्वप्रथम करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक शशिकांत पाटकर, उद्योगपती दीपक घैसास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांचे पुष्पाची परडी देऊन अर्चना गोरे यांनी स्वागत केले. शिवाजी महाराजांचे चरित्र हे असामान्य आणि औलोकिक होते. शिवाजी महाराजांच्या ठायी पराक्रम, आक्रमकता, निर्भयता, धाडसीपणा, शत्रूचा संपूर्ण बिमोड आणि जनतेबद्दलचा दयाळूपणा आणि अमापप्रेम या गुणांचा समुच्चय झालेला होता. पण आजही अनेकांना राजांच्या चरित्राची माहिती नसल्याची खंत बाबासाहेबांनी व्यक्त केली. शिवाजी राजांच्या थरारक आयुष्यातील अनेक प्रसंग शिवशाहीरांनी आपल्या अमोघ वाणीमध्ये उपस्थितांना सांगितले तेव्हा अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. शिवाजी महाराजांचे चरित्र जेव्हा आपण समजावून घेऊन आचरणात आणू तेव्हाच राज्याचा उत्कर्ष आपल्याला साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.