महापौर निवडणुकीत समीकरणे बदलली
By Admin | Updated: September 27, 2014 00:27 IST2014-09-27T00:27:54+5:302014-09-27T00:27:54+5:30
महापालिका महापौर निवडणुकीपूर्वी महायुती तुटल्याने शहरातील राजकीय समीकरण बदलले असून महापौरपदासाठी सर्वच पक्षांत रस्सीखेच सुरू झाली आहे

महापौर निवडणुकीत समीकरणे बदलली
संदानंद नाईक, उल्हासनगर
महापालिका महापौर निवडणुकीपूर्वी महायुती तुटल्याने शहरातील राजकीय समीकरण बदलले असून महापौरपदासाठी सर्वच पक्षांत रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौरपदाची निवडणूक ४ आॅक्टोबर रोजी होणार असल्याने मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर महापालिकेवर गेल्या साडेसात वर्षांपासून महायुतीची सत्ता असून महायुतीतील साई पक्षाकडे महापौरपद तर उपमहापौरपद भाजपाकडे आहे. स्थायी समिती सभापतीपद शिवसेनेकडे आहे. महापौरपदाची निवडणूक ४ आॅक्टोबर रोजी होणार असून २९ सप्टेंबर रोजी अर्ज भरण्यात येणार आहेत.
पालिकेत शिवसेनेचे- २०, भाजपाचे- ११, साई पक्षाचे- ७, बीएसपीचे- २, रिपाइंचे- ४, तर राष्ट्रवादी पक्षाचे- २१, काँग्रेसचे- ६, मनसे- १ व अपक्षांचे- ५ असे पक्षीय बलाबल आहे. महायुती तुटल्याने पालिकेत महापौर शिवसेनेचा की राष्ट्रवादीचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ आमचाच महापौर होणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली़ पालिकेतील प्रमुख पक्षांकडे बहुमत नसल्याने महापौर निवडणुकीतील राजकीय उलथापालथीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साई पक्षासह मित्र पक्षांकडे ९ नगरसेवक असून महापौरपदाची किल्ली साई पक्षाकडे आल्याचे बोलले जात आहे. शिवसेना, साई, काँग्रेस व अपक्ष अशी युती होण्याची शक्यता व्यक्त होत असून आघाडीकडे- ४० नगरसेवकाची संख्या होत आहे. बहुमतासाठी ३९ नगरसेवकांची आवश्यकता आहे़ महापौरपदासह उपमहापौर, स्थायी समितीपदाची नव्याने विभागणी आघाडीत होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाकडे-२१, भाजपाकडे- ११, अपक्ष- ४, रिपाइं- ४ असे पक्षीय बलाबल असून राष्ट्रवादी पक्ष, भाजपा, रिपाइंची आघाडी अपक्षांच्या मदतीने महापौर-उपमहापौरपद पटकावणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर निवडणुकीवरच विधानसभा निवडणुकीचे गणित अवलंबून असून पालिकेचे महापौरपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. शिवसेनेत ६ नगरसेविका ओबीसी संवर्गातून निवडून आल्या असून महापौरपदासाठी समिधा कोरडे, नेहा भोईर व अपेक्षा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे ४ आॅक्टोबरच्या महापौर निवडणुकीत कोणती राजकीय आघाडी तयार होत, याकडे सर्वांचे लक्ष आहे.