दाखल्यांमुळे प्रवेश रखडू देणार नाही
By Admin | Updated: June 20, 2015 23:06 IST2015-06-20T23:06:11+5:302015-06-20T23:06:11+5:30
येथील सेतू कार्यालयातील संगणक यंत्रणेतील अडचणींमुळे दाखल्याविना विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत येऊ नयेत. त्यासाठी त्यांना संबंधित

दाखल्यांमुळे प्रवेश रखडू देणार नाही
ठाणे : येथील सेतू कार्यालयातील संगणक यंत्रणेतील अडचणींमुळे दाखल्याविना विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत येऊ नयेत. त्यासाठी त्यांना संबंधित महाविद्यालयाच्या नावे पत्र देण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरु वारी ठाणे तहसीलदार विकास पाटील यांना दिले.
ठाणे तहसील कार्यालयाचे सेतू कार्यालयातील सर्व्हर गेल्या सहा दिवसांपासून डाऊन असल्यामुळे आॅनलाईन दाखले देण्याचे काम खोळंबले आहे.यामुळे विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास होत आहे. याची गंभीर दाखल घेऊन गुरूवारी शिंदे यांनी तहसीलदार कार्यालयात भेट देऊन समस्यांची माहिती घेऊन संबंधित अडचणींची जाणून घेतल्या. महाविद्यालयीन प्रवेशासाठी सध्या पालक व विद्यार्थ्यांची तारांबळ सुरु असून यंत्रणेतील अडचणींमुळे एक दाखला डाउनलोड होण्यासाठी तीन मिनिटांऐवजी अर्धा ते पाऊण तास लागत असल्याविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच दोन दिवसात आॅन लाईन दाखल्याचे काम पूर्ववत सुरु होईल असे सांगितले. यावेळी त्यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
एकाही विद्यार्थ्याचे महाविद्यालयीन प्रवेशाचे काम या अशा अडचणींमुळे रखडू नये, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर महाविद्यालयाच्या नावे पत्र देण्याचे काम तहसील कार्यालयाने सुरु केले आहे. (प्रतिनिधी)
भिवंडी : शहरांतील सेतू कार्यालयात शासनाकडे नोंद करणारे सॉफ्टवेअर अचानकपणे गुरूवारी सायंकाळपासून बंद झाल्याने विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर दाखल्यासह इतर दाखले मिळणे कठीण झाले आहे.
-बारावीच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी सेतू कार्यालयात विविध दाखल्यासाठी अर्ज केले. शनिवारी व रविवारी कार्यालये बंद असल्याने तसेच नॉन क्रिमीलेअर व जातीच्या अर्जाचा अवधी जास्त असल्याने नागरिकांना दाखले मिळण्यास उशीर झाला. त्यातच गुरूवावारपासून शासनाचे सॉफ्टवेअर बंद झाल्याने तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होऊन ते केवळ दाखल्यासाठी अडचणीत सापडले आहेत.
-ते जमा न केल्यास शासनाच्या आॅनलाईनवर त्या विद्यार्थ्यांची ओपनमध्ये नोंद होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. शासनाच्या सवलती मिळविण्यासाठी शासनप्रक्रियेतील तांत्रिक साधने महाविद्यालयीन प्रक्रियेपर्यंत सुसज्ज असल्यास त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणे शक्य होणार आहे. तसेच जातीच्या दाखल्याप्रमाणे उत्पन्नाचा दाखला जमा न केल्यास त्या विद्यार्थ्यास शासन सवलती मिळणार नाहीत. या दाखल्यासाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.