पाणी निचर्याच्या नाल्यावर अतिक्रमणे
By Admin | Updated: May 27, 2014 23:48 IST2014-05-27T23:48:39+5:302014-05-27T23:48:39+5:30
शेतकर्यांच्या जमिनी खरेदी करुन गोदामे उभारताना गावांच्या नैसर्गिक पाणी निचर्याच्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करणार्या कंपन्यांच्या प्रशासनासमोर महसूल यंत्रणा कुचकामी ठरली

पाणी निचर्याच्या नाल्यावर अतिक्रमणे
चिरनेर : शेतकर्यांच्या जमिनी खरेदी करुन गोदामे उभारताना गावांच्या नैसर्गिक पाणी निचर्याच्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करणार्या कंपन्यांच्या प्रशासनासमोर महसूल यंत्रणा कुचकामी ठरली असल्याने येत्या पावसाळ्यात उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका बळावला आहे. अशा कंपन्यांवर बेधडक कारवाई करण्याऐवजी महसूल यंत्रणा केवळ जुजबी कारवाईच्या नोटीसा धाडून मूग गिळून बसत असल्याने पावसाळी आपत्ती व्यवस्थापनाच्या निमित्ताने आपत्तीतून बाहेर पडण्याची प्रात्यक्षिके दाखविणारे उरण तहसीलदार कार्यालय ज्यांच्यामुळे अशी आपत्ती ओढवण्याची परिस्थिती झाली आहे. उरण तालुक्यातील सिडकोग्रस्त नवघर, भेंडखळ, करळ आदी गावांसह खोपटा, चिरनेर या गावांमध्ये अगदी दरवर्षी पावसाचे पाणी शिरण्याची परिस्थिती उद्भवत असते. यातील चिरनेरसारख्या गावात तर अगदी घराघरात पुरुषभर पाणी शिरण्याची नामुष्की ओढवत असते. कधी नव्हे ते खोपटा पाटीलपाडा गावातील काही घरांच्या पायर्यांपर्यंत पाणी शिरण्याच्या घटना गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात नागरिकांना अनुभवायला मिळाल्या. या सर्व पार्श्वभूमीवर खोपटा परिसरातील नैसर्गिक पाणी निचर्याच्या नाल्यांवर खाजगी गोदामांची केलेल्या अतिक्रमणांकडे महसूल प्रशासन मात्र अर्थपूर्णरित्या कानाडोळा करीत आहे. यातील सर्वात मोठी बाब म्हणजे खोपटे धसाखोशी गावासह परिसरातील शेतीच्या पाण्याचा निचरा करणारी जेजुरीची पऊल नावाचा नैसर्गिक पाणी निचर्याचा नालाच अमेया लॉजिस्टिक नामक गोदामाने थेट पाईप टाकून कंपनीत घेऊन टाकला आहे. या प्रकारामुळे परिसरातील सुमारे दहा ते बारा शेतकर्यांची शेती नापीक झाली आहे. अशा शेतकर्यांना जुजबी नुकसानभरपाई देऊन शांत केले जात आहे. मात्र अशा प्रकारामुळे गावातच पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालेला असताना महसूल खाते नजरेत भरणार्या या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. नव्या ट्रान्स इंडिया गोदामानेही अगदी पिरकोन ते पाणदिवे गावाच्या पाण्यासह या भागातील संपूर्ण खाडीच्या पाण्याचा निचरा करणार्या मुख्य नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. या नाल्याच्या बांधावरुन शेतकर्यांची वहिवाटीची पाऊलवाटही गायब करण्यात आली आहे. त्यामुळे शेतीचे अवजार घेवून जाणार्या शेतकर्यांना बांधाऐवजी कंबरभर पाण्यातून पलिकडे जाण्याची वेळ येऊन ठेपली असताना तालुक्याचे महसूल प्रशासन मात्र ढिम्म बसले आहे. याच कंपनीच्या सिमेंटच्या भिंती बांधताना सोनखारीची पऊल नावाच्या नैसर्गिक पाणी निचर्याच्या बांधाला अगदी खेटून बांधल्या आहेत. त्यामुळे या बांधावरुनही शेतकर्यांना चालणे मुश्कील झाले आहे. ही बाब महसूल विभागाच्या स्थानिक तलाठी सर्कल यांच्या अनेकदा निदर्शनास आणून दिल्यावर तलाठी पठाण यांनी तसा अहवालही यापूर्वीच तहसील कार्यालयाला पाठवला आहे. तहसील कार्यालयाने याबाबत कोणतीही कारवाईच केली नसल्याने शेतकर्यांना वालीच कोणी उरला नाही. त्याचबरोबर या नाल्याचीही रुंदी कमी झाली असल्याने या सोनखारीच्या पवलीतून पावसाचे पाणी वाहून जायला अडथळे निर्माण झाले असल्याने पाटीलपाडा गावात यावर्षीही पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. विरगो डिस्ट्रीपार्क नावाच्या अनधिकृत गोदामाने हा सोनखारीच्या पवळीचा काही भाग थेट पाईप टाकून आपल्या प्रकल्पात घेतला असल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात खोपट्यासारख्या गावात पाणी साचून राहण्याचा धोका आहे. बांधपाडा गावाच्या नैसर्गिक पाणी निचर्याच्या नाल्यावरच थेट पाईप टाकून त्यवर दोन मजल्याची इमारत बांधण्याचे धाडस एका खाजगी गोदामाने केले आहे याबाबत उरणचे तहसीलदार डॉ. नितीन चव्हाण यांना विचारले असता त्यांनी मी बघतो पाहून काही करता येतं का असे सांगितले. तर कंपनीने मोठ्या खाडीच्या नाल्यावर केलेल्या अतिक्रमणाबाबत येथील शेतकरी रमेश गण्णात ठाकूर यांनी तहसीलदारांपासून ते रायगडच्या जिल्हाधिकार्यांपर्यंत पत्रव्यवहार करुनही उपयोग नसल्याने कंपनीचे हे अतिक्रमण पिकत्या शेतीसह बांधपाडा गावावर ही नैसर्गिक आपत्ती आणण्यास कारणीभूत ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)