‘ते’ कर्मचारीही केडीएमसीमध्ये समाविष्ट होणार !
By Admin | Updated: June 16, 2015 23:36 IST2015-06-16T23:36:16+5:302015-06-16T23:36:16+5:30
कल्याण-डोंबिवलीत ती २७ गावे समाविष्ट झाल्यानंतर आता त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींमधील विविध श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घ्या,

‘ते’ कर्मचारीही केडीएमसीमध्ये समाविष्ट होणार !
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत ती २७ गावे समाविष्ट झाल्यानंतर आता त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींमधील विविध श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घ्या, असे साकडे त्या गावांच्या सुमारे चारशेहून कर्मचाऱ्यांनी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सुभाष भोईर, माजी आमदार रमेश म्हात्रे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील आदींच्या माध्यमातून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना घातले. त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घरत यांच्या डोंबिवली येथील दालनात शुक्रवारी सकाळी पार पडली.
त्या वेळी झालेल्या चर्चेत त्या गावांना महापालिकेत सामावून घेण्याच्या निर्णयानंतर आपोआपच त्या गावांची स्थावर, जंगम मालमत्ता आणि अन्य कागदपत्रे अशी ‘दप्तर’ हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर जे कार्यरत कर्मचारी होते, त्यांच्याबाबतची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित बीडीओंची असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना महापालिकेत निश्चितच सामावून घेतले जाईल, असा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला. कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक असेल तर ते आणि काही ठिकाणी असलेले हजेरी बुक आदींच्या आधारे आणि जेव्हा भरती झाले तेव्हाची कागदपत्रे आदींद्वारे तपासणी करण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)